संगमनेर – कांद्याला केवळ 180 रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वडगाव पान (ता. संगमनेर) येथे आज, (दि. ११ नोव्हेंबर) महायुती सरकार विरोधात अनोख्या पद्धतीने तीव्र आंदोलन केले. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे टाकून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.
वडगाव पान येथील शेतकऱ्यांनी सध्याचे महायुतीचे केंद्र आणि राज्य सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार असल्याचा आणि ते शेतकरी विरोधी असल्याचा थेट आरोप केला. राज्य सरकारकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नसल्याचा दावा करत, संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल पाच ट्रॅक्टर कांदे रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये टाकून निषेध व्यक्त केला. खड्डे बुजवण्यासाठी ही आमच्याकडून सरकारला मदत, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी महायुती सरकारचा तीव्र निषेध केला. कांद्यांनी संपूर्ण रस्ता लाल झाल्याने आंदोलनाची दृश्ये लक्षवेधी ठरली.
या आंदोलनात कारखान्याचे माजी चेअरमन बाबा ओहोळ, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, गणेश गडगे, सोसायटीचे चेअरमन आबासाहेब थोरात, विक्रम ओहोळ, प्रशांत थोरात, कैलास थोरात, बाबासाहेब थोरात, मनोज थोरात, निलेश थोरात, संभाजी थोरात, मंगेश थोरात, अजय थोरात, सोमनाथ कुळधरण, नरेंद्र वायकर, संदीप काशीद, धनंजय थोरात, सतीश थोरात, सुनील थोरात, अविनाश थोरात, गणपत थोरात, आदींसह युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब गायकवाड यांनी राज्य सरकार शेतकरी विरोधी असून गोरगरिबांचे काही घेणे-देणे नसल्याचा आरोप केला. निवडणुकीमध्ये कर्जमाफी आणि हमीभावाच्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात कांद्याला 180 रुपयांचा भाव देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. सरकारकडे पैसे नसल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, म्हणून आम्ही हे खड्डे बुजवण्यासाठी कांदे टाकत आहोत, असे ते म्हणाले.
विक्रम ओहोळ यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कृषी व महसूल मंत्री असताना शेतकऱ्यांना कायम मदत केली आणि त्यांच्या प्रश्नांना प्राथमिकता दिली होती, याची आठवण करून दिली. मात्र, आत्ताचे कृषीमंत्री आणि महसूल मंत्री हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असून शेतकऱ्यांची चेष्टा सुरू असल्याचा आरोप करत सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले.
तर निलेश थोरात यांनी तरुणांच्या समस्यांवर लक्ष वेधले. तरुणांना काम नाही, बेरोजगारी वाढली आहे, शेतीमालाला भाव नाही, अशा स्थितीत केवळ मोबाईलमध्ये गुंतवून ठेवण्याचे काम या सरकारने केले आहे. महायुती सरकारला खाली खेचण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कांद्याला कवडीमोल भाव! महायुती सरकार विरोधात संतप्त शेतकऱ्यांचे रस्त्यावरील खड्ड्यात कांदे टाकून ‘अनोखे’ आंदोलन
शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे टाकून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.



संगमनेर – 
यावेळी बोलताना बाळासाहेब गायकवाड यांनी
