संगमनेर (प्रतिनिधी)
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहराच्या विकासाचा अभिमान व्यक्त करत, गेल्या एका वर्षात शहरात वाढलेल्या अमली पदार्थांची तस्करी आणि गुंडगिरीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संगमनेर शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली पुणे-नाशिक रेल्वे दुसऱ्या तालुक्यातून कशी गेली, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
जनता नगर येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांच्यासह उमेदवार विश्वासराव मुर्तडक, डॉ. अनुराधा सातपुते, सोमेश्वर दिवटे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे डॉ. किशोर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, तीस वर्षांमध्ये नगरपालिका अत्यंत आदर्श पद्धतीने चालवली. शहराला निळवंड्यातून थेट पाईपलाईनद्वारे स्वच्छ पाणी मिळते आहे, जो आमच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. याचबरोबर, इंजिनिअरिंग कॉलेज ते बस स्थानक हा अद्ययावत रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेले कष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवेत.
आपण शहर जपले, मात्र मागील एका वर्षात शहरात अस्वस्थता वाढली असून अमली पदार्थांची तस्करी व दहशत वाढली आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, शहरात ड्रग्स, इंजेक्शन आणि नशील्या गोळ्या उपलब्ध होत आहेत आणि धर्माच्या नावावर काळे धंदे सुरू आहेत. मागील आठवड्यात एका तरुणाचा हात तुटल्याच्या घटनेचा उल्लेख करत, त्यांनी यामागील सूत्रधार तपासण्याची गरज बोलून दाखवली.
थोरात यांनी नागरिकांना आवाहन केले की, अमली पदार्थांचा माफिया बस स्थानकासमोरच्या सभेत मोरक्या होतो आहे. ही बाहेरची प्रवृत्ती आपल्याला संगमनेरमध्ये येऊ द्यायची नाही. आपले संगमनेर वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे.
संगमनेरसाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला, पोखरी हवेली येथे रेल्वे स्टेशनसाठी जागाही नियोजित केली होती, असे थोरात यांनी सांगितले. सर्व नियोजित असताना ही महत्त्वाची रेल्वे बाहेरून जाते कशी, हे पहिले सांगा, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
आमदार सत्यजित तांबे यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात सातत्याने विकासाच्या योजना राबविल्याचे सांगितले. सेवा समितीने २० नवीन व ११ अनुभवी उमेदवार निवडणुकीत दिले आहेत. शहराला मिळणारे पाणी ५० ते १५० टीडीएसचे असून ते अत्यंत शुद्ध आहे आणि राज्यात असे पाणी कुठेही नाही. थोरात यांच्या नेतृत्वाचा सर्वपक्षीय नेते आदर करतात. विकास कामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी झाली आहे, असे तांबे यांनी नमूद केले. आगामी काळात एकाच वेळी पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार तांबे यांनी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी बस स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा नियोजित जागेवर उभारणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सध्याच्या पुतळ्याच्या जागेवर १५० फुटी तिरंगा व शहीद स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी निधीचा पाठपुरावा सुरू आहे. श्रीरामपूरला आपल्यानंतर महाराजांचा पुतळा होतो. मात्र याबाबत नवीन लोकप्रतिनिधी गप्प आहेत. विकास कामे आम्ही केली म्हणून आम्ही सांगतो, कुणाच्या निधीवर आम्ही गप्पा मारत नाही, असे तांबे यांनी स्पष्ट केले.
या सभेला प्रभागातील कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाचा अभिमान, पण वाढत्या ‘ड्रग्स’ आणि ‘दहशती’वर थोरात संतप्त; पुणे-नाशिक रेल्वे मार्गावरून थेट प्रश्न!
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका वर्षात वाढलेल्या अमली पदार्थ तस्करीत आणि गुंडगिरीवर चिंता व्यक्त करत, 'शांत' शहरात वाढलेली अस्वस्थता नेमकी कोणामुळे, असा थेट सवाल केला आहे. तसेच, अत्यंत महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक रेल्वे मार्ग संगमनेरातून न जाता दुसऱ्या तालुक्यातून कसा गेला, यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी विकासकामांवर भाष्य करत आगामी योजनांचा उल्लेख केला.




संगमनेर (प्रतिनिधी)
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,
आमदार सत्यजित तांबे यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली