संगमनेर-
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे महत्त्व ओळखून, संगमनेर रेल्वे कृती समितीने येथील लोकप्रतिनिधींना केवळ छायाचित्रांसाठी स्टंटबाजी न करता, नाशिक-पुणे रेल्वे शिर्डीमार्गे वळवल्याबद्दल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन जनतेचा आवाज बुलंद करण्याचे आणि पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. समितीने शहरातील नवीन लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला असून, मागील एका वर्षात शहरात अमली पदार्थ आले पण विकासाची रेल्वे पळाली, असा थेट आरोप केला आहे.
शिर्डीमार्गे वळवलेल्या रेल्वेला विरोध करा- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नाशिक-पुणे रेल्वेसाठी पाठपुरावा केला होता, मात्र विद्यमान सत्ताधारी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी ही रेल्वे शिर्डी मार्गे वळवली आहे. हा निर्णय संगमनेर, अकोले परिसराच्या औद्योगिक, व्यापार वाढीसाठी आणि तरुणांच्या नोकरी-व्यवसायासाठी अत्यंत नुकसानदायक ठरणारा आहे.
रेल्वे कृती समितीच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावर रेल्वे मार्गाचे होर्डिंग्ज उभारून नागरिकांना या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संगमनेरच्या दळणवळण आणि व्यापार वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली रेल्वे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी शिर्डी मार्गे वळवली. याला संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी केवळ विरोधच नाही, तर प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी दाखवली पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आमदार तांबेंच्या जनचळवळीत सामील व्हा- आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक-पुणे रेल्वेसाठी मोठी लोक चळवळ उभी केली आहे. यात ऑनलाइन कॅम्पियन आणि सह्यांची मोहीम संगमनेरमध्ये सुरू झाली आहे. यामध्ये सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, खेड, मंचर येथील सर्वपक्षीय नागरिक आणि लोकप्रतिनिधी सहभागी आहेत.
समितीने संगमनेरच्या लोकप्रतिनिधींना लक्ष्य करताना म्हटले आहे की, नागपूर अधिवेशनामध्ये हातात फलक घेऊन स्टंटबाजी करण्यापेक्षा त्यांनी आमदार तांबे यांनी सुरू केलेल्या जनआंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा. फक्त फोटोसाठी फ्लेक्सबाजी न करता, मुख्यमंत्र्यांसमोर आवाज उठवा, उपोषणाला बसा किंवा राजीनामा द्या; पण ठोस कृती करा.
संगमनेरचे लोकप्रतिनिधी काम न करता स्टंटबाजी आणि विकास न करता फ्लेक्सबाजी करतात, अशी टीका समितीने केली आहे.
अमली पदार्थांचे आगमन, रेल्वेचे पलायन- युवक कार्यकर्ते प्रवीण गुंजाळ, प्रवीण पानसरे आणि सचिन दिघे यांनी तीव्र भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, मागील एक वर्षात संगमनेर शहर आणि तालुक्यात अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. ‘ड्रग्स, एमडी, मेडिसिन आणि अवैध धंदे वाढले. एका वर्षात अमली पदार्थ शहरात आले, मात्र विकासाची रेल्वे बाहेर गेली.’ या गंभीर परिस्थितीला कोण जबाबदार आहे, याचे उत्तर नवीन लोकप्रतिनिधींनी दिले पाहिजे, अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
संगमनेर रेल्वे मार्गासाठी स्टंटबाजी नको, जनतेच्या आवाजासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा: रेल्वे कृती समितीची मागणी
संगमनेरचे लोकप्रतिनिधी काम न करता स्टंटबाजी आणि विकास न करता फ्लेक्सबाजी करतात, अशी टीका समितीने केली आहे.



संगमनेर- 
आमदार तांबेंच्या जनचळवळीत सामील व्हा-
अमली पदार्थांचे आगमन, रेल्वेचे पलायन-