
संगमनेर/नागपूर –
संगमनेर बुद्रुक येथील सर्वे नं. १०६(४४२) मधील इंदिरानगर परिसरातील रहिवाशांच्या ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकी हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महसूल अभिलेखात मणियार कुटुंबाची मालकी असतानाही प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या या जमिनीच्या नोंदी रहिवाशांच्या नावे करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले आहे. दरम्यान यासंदर्भात दिरंगाई करणाऱ्या सब रजिस्ट्रारची बदली करून चौकशी केली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली.
या किचकट कायदेशीर प्रक्रियेत निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी आमदार तांबे यांनी थेट मणियार कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची नावे कमी करून रहिवाशांना ‘कन्फरमेशन डीड’ करून देण्याची विनंती केली होती. मणियार कुटुंबीयांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने इंदिरानगरमधील सर्व रहिवाशांचे जमिनीचे उतारे (टायटल) एका दिवसात क्लिअर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिवेशनात प्रश्न उपस्थित, दिरंगाई करणाऱ्यावर कारवाई – दरम्यान यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष कब्जाधारकांच्या नावे नोंद प्रक्रिया राबवण्याचा आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. या दिरंगाईची दखल घेत आमदार तांबे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला आणि विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
महसूल मंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन – यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या सब रजिस्ट्रार यांची बदली करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कोणाच्या दबावाखाली हा हलगर्जीपणा झाला, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
३ दिवसांत मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया – सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पुढील ३ दिवसांत या जागांचे मालकी हक्क स्थानिक रहिवाशांकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले आहे.
प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने इंदिरानगरच्या रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार तांबे यांनी या संपूर्ण पाठपुराव्याबद्दल महसूल मंत्र्यांचे आभार मानले आहेत.
आमदार सत्यजित तांबे यांनी यासाठी केलेला पाठपुरावा…
📌 11 जुलै 2025 – या प्रकरणासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली.
📌 14 जुलै 2025 – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकरणाचं गांभीर्य मांडलं.
📌 30 जुलै 2025 – माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, संगमनेरचे तहसीलदार आणि इतर महसूल अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन प्रत्यक्ष कब्जाधारकांच्या नावे नोंद प्रक्रिया राबवण्याचा निर्णय.
📌 1 ऑगस्ट 2025 – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा पत्र लिहून सर्व नं. 106(442) प्रमाणे सर्वे नं. 104, 105, 219 येथील कब्जाधारकांच्या नावे नोंद प्रक्रिया राबवण्याची विनंती.
📌 5 ऑगस्ट 2025 – पुन्हा महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. मात्र, माननीय मंत्री महोदयांनी आदेश देऊनही अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे याबाबत आज तांबे यांनी थेट हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून या विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तातडीने सदर जमिनीचे मालकी हक्क स्थानिक रहिवाशांच्या नावे कन्फरमेशन डिड करून हस्तांतरित करावे अशी मागणी केली होती.
- तांबे यांच्या मागणीच्या उत्तरात महसूल मंत्री म्हणाले… महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या सब रजिट्रार यांची बदली करण्याचे आश्वासन दिले आहे. कोणाच्या दबावात असा हलगर्जीपणा करण्यात आला याचीही चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, पुढील 3 दिवसात या जागांचे मालकी हक्क रहिवाशांकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येईल. असे महसूलमंत्र्यांनी आमदार तांबे यांना आश्वस्त केले आहे. याबद्दल तांबे यांनी महसूलमंत्र्यांना धन्यवाद दिले आहे.
- नेमकं काय करणार… जवळपास ७०० नागरिकांचे दस्त नोंदणीसाठी प्रलंबित असल्याने आणि एकाच दिवशी एवढी मोठी कामे कार्यालयाच्या मनुष्यबळासाठी शक्य नसल्यामुळे, महसूल मंत्र्यांनी विशेष उपाययोजना जाहीर केली. ७०० दस्तनोंदणीचे काम पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांचा विशेष कॅम्प लावण्यात येणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाला अतिरिक्त मनुष्यबळ पुरवले जाईल, जेणेकरून सर्व नागरिकांचे काम जलद गतीने पूर्ण होईल. आयजीआर स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी संगमनेरला उपस्थित राहतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.


Post Views: 1,177