

संगमनेर –
संगमनेरचे तत्कालीन नायब तहसीलदार दत्ता जाधव आणि तलाठी पोमल तोरणे यांच्यावर हल्ला करून ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून येथील जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटलाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले होते.
मुमताज हसन शेख, आयुब हसन शेख व लतीफ हसन शेख असे न्यायालयाने मुक्तता केलेल्या आरोपींची नावे आहे.
०८ ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी सुमारे साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान ही घडली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. १८५/२०१५ नुसार आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७, ३९४, ३५३, ३३२, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
फिर्यादीनुसार, सदर आरोपी घटनेच्या वेळी वाळूची अवैध वाहतूक करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जात होते. नदीपात्रातून कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर तलाठी पोमल तोरणे व नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी पाठलाग करत वाळूने भरलेला ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, मुमताज हसन शेख, आयुब हसन शेख आणि लतीफ हसन शेख या तिघांनी नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला यादरम्यान तलाठी तोरणे यांनी त्यांची मोटरसायकल बाजूला केल्याने त्यांचे प्राण वाचले. आरोपींनी नायब तहसीलदार जाधव आणि तलाठी तोरणे यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
मारहाणीमध्ये आरोपींनी नायब तहसीलदार जाधव यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, तलाठी तोरणे यांच्या उजव्या हाताला बोटाला, कोपराला, डाव्या बरगडीत, पोटात व पाठीत मारहाण करण्यात आली, तर नायब तहसीलदार जाधव यांच्या छातीत मुका मार लागला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली. या प्रकरणाच्या अनुषंगाने सरकार पक्षातर्फे फिर्यादी तलाठी पोमल तोरणे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, डॉ. भास्कर भवर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण व इतर साक्षीदारांसह एकूण ८ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश नेरलेकर यांच्यासमोर आरोपींविरुद्ध कोणताही गुन्हा शाबित न झाल्यामुळे, त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
आरोपींच्यावतीने ॲड. बाळासाहेब एस. शिंदे यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. अश्विनी पी. खरात यांनी सहकार्य केले.



०८ ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी सुमारे साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान ही घडली होती.
मारहाणीमध्ये आरोपींनी नायब तहसीलदार जाधव यांचा मोबाईल