अहिल्यानगर: जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळांमध्ये मतदान केंद्रे आहेत, अशा शाळांना शुक्रवार १९ डिसेंबर आणि शनिवार २० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील राहाता वगळून उर्वरित संगमनेर, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी या नगरपरिषदा आणि नेवासा नगरपंचायत या ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी मतदानाच्या एक दिवस अगोदर, म्हणजेच १९ डिसेंबर रोजीच केंद्रांवर दाखल होणार आहेत. निवडणूक कामात कोणताही अडथळा येऊ नये आणि तयारी पूर्ण करता यावी, यासाठी संबंधित शाळांना दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
या कालावधीत शाळांच्या इमारती निवडणूक कामासाठी पूर्णपणे उपलब्ध राहतील. तसेच, संबंधित केंद्रांवर पिण्याचे पाणी आणि वीज व्यवस्था सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.







