संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज:
संगमनेर तालुक्याच्या जनतेने ४० वर्षे प्रेम दिले, आम्ही कष्टाने निळवंडे धरण, थेट पाईपलाईन आणि रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला. मात्र, आता हाच विकासाचा वारसा उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू असून ज्यांनी रेल्वे पळवली, त्यांना ओळखा आणि तालुका वाचवण्यासाठी वेळीच एकत्र या, असे प्रखर आवाहन माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर सेवा समितीच्यावतीने गणेशनगर येथे आयोजित नगरपालिका निवडणुकीच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगराध्यक्ष व उमेदवार असलेले दिलीप पुंड, अर्चना दिघे, डॉ. मैथिलीताई तांबे, बाळकृष्ण महाराज कर्पे, रामहरी कातोरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, चाळीस वर्षे जनतेने दिलेल्या संधीतून आम्ही संगमनेर बस स्थानक, निळवंडे धरण, थेट पाईपलाईन यांसारख्या अनेक विकास योजना राबवल्या. मात्र, दुर्दैवाने मागील एका वर्षात तालुक्यात गांजा आणि ड्रग्ससारख्या अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली असून यामागे नक्की कुणाचा हात आहे हे शोधण्याची वेळ आली आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती तालुका उध्वस्त करू पाहत असून तिला वेळीच रोखणे गरजेचे आहे.
मी मंत्री असताना रेल्वे मार्ग प्रस्तावित होऊन ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले गेले होते, मग आताच हा मार्ग पळवण्याचे कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही लोकांनी विधानसभेत माझ्यावर खोटे आरोप केले, पण संपूर्ण महाराष्ट्र अशा आरोपांना भीक घालणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी विरोधकांचा तीव्र समाचार घेतला. ते म्हणाले की, एक डिसेंबरला येथील नवीन लोकप्रतिनिधी म्हणतात की रेल्वे पळवायला ती काय बागेतील खेळणी आहे का? आणि अवघ्या दोन दिवसात केंद्रीय मंत्री रेल्वे मार्ग बदलण्याचे संकेत देतात. हे सर्व संगमनेरच्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सुरू आहे. आज रेल्वे पळवली, उद्या पाणी पळवतील, त्यामुळे संगमनेरच्या जनतेने आता पेटून उठले पाहिजे.
बाहेरच्या रिमोटवर चालणारा लोकप्रतिनिधी आपल्याला नको असून संगमनेरची सत्ता याच मातीतील हक्काच्या माणसांकडे असायला हवी. सेवा समितीची सत्ता आल्यानंतर रामनगर, गांधीनगर, श्रमिकनगर मधील गरिबांना हक्काची घरे मिळवून देणार असल्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
या सभेला संगमनेर शहर व गणेश नगर परिसरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेल्वे प्रश्नी २२ तारखेला निर्णायक बैठक!
संगमनेरच्या रेल्वे प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत केंद्रीय मंत्र्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रश्नावर २२ तारखेला महत्त्वाची बैठक होणार असून, हक्काच्या रेल्वेसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








