संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सत्तेची खुर्ची गाजण्यापूर्वीच ‘सेवेचा झाडू’ हातात घेतला आहे. “निवडणूक संपली, आता केवळ विकास आणि स्वच्छता” हा संदेश देत नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संगमनेरच्या हायटेक बसस्थानक परिसरासह मुख्य रस्त्यांचे विद्रुपीकरण दूर करून स्वच्छतेचा नवा आदर्श घालून दिला आहे.
रात्री रस्ते धुतले, सकाळी झाडू मारला: असा झाला ‘ॲक्शन प्लॅन’- विजयाचा उत्सव साजरा झाल्यावर विश्रांती घेण्याऐवजी नवनिर्वाचित नगरसेवकांनी रात्रीच कामाला सुरुवात केली. नाशिक-पुणे महामार्गावरील ऑरेंज कॉर्नर ते बसस्थानक हा मुख्य रस्ता रात्रीच पाण्याने स्वच्छ धुऊन काढण्यात आला. सकाळी उजेड पडताच डॉ. मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी बसस्थानकातील दत्त मंदिरात आरती केली आणि हातात झाडू घेऊन प्रत्यक्ष साफसफाईला सुरुवात केली.
गेल्या वर्षभरात विविध कारणांनी झालेल्या फ्लेक्सबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते. हे सर्व अनावश्यक फलक हटवून परिसर मोकळा आणि स्वच्छ करण्यात आला.
बाळासाहेब थोरातांचा ‘राजधर्मा’चा सल्ला- या मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात भावूक झाले होते. ते म्हणाले, संगमनेरची राजकीय संस्कृती ही सुसंस्कृतपणाची आहे. ही नगरपालिका केवळ सत्ता गाजवण्यासाठी नाही, तर हे एक कुटुंब आहे. जनतेने जो प्रचंड विश्वास आपल्यावर टाकला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी पहिल्या दिवसापासून कामाला लागा. सर्व समाजाला सोबत घेऊन शहराचा विकास करा.
नगरसेवकांची ‘फौज’ मैदानात- या मोहिमेत केवळ नेतेच नाही तर नवनिर्वाचित नगरसेवकांचा उत्साह दांडगा होता. दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, सीमाताई खटाटे, भारत बोराडे, अर्चना सुभाष दिघे, सौरभ कासार, शोभाताई पवार, प्राची काशीद, किशोर पवार, डॉ. अनुराधा सातपुते, वनिता गाडे, गजेंद्र अभंग, मालती डाके, नितीन अभंग, दिपाली पंचारिया, अमजदखान पठाण, डॉ. दानिश खान, किशोर टोकसे, प्रियंका शहा, शैलेश कलंत्री यांसह शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अजित काकडे व सतीश आहेर यांनी स्वतः सक्रिय सहभाग नोंदवला.
जनतेतून कौतुकाचा वर्षाव- नेहमीप्रमाणे सत्कार आणि भाषणाबाजीच्या चक्रात न अडकता, थेट रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या या नवीन टीमचे संगमनेरकरांकडून मोठे कौतुक होत आहे. अशीच कामाची गती राहिली तर संगमनेरचा कायापालट निश्चित आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्वच्छ संगमनेर, देशात अग्रगण्य करण्याचे स्वप्न: डॉ. मैथिलीताई तांबे– नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी आपल्या कृतीतून विरोधकांना आणि नागरिकांना मोठा संदेश दिला आहे. त्या म्हणाल्या, शहरातील जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे. निवडणुकीपुरते राजकारण आता संपले आहे. आजपासून आम्ही केवळ शहराचे सेवक आहोत. आमचे ध्येय ‘स्वच्छ, सुंदर आणि हरित संगमनेर’ हेच आहे. केवळ बसस्थानकच नाही, तर शहरातील प्रत्येक गल्ली आणि उपनगर चकाचक करण्याचा आमचा मानस आहे.
धडाका! गुलालाचा रंग ओसरण्यापूर्वीच संगमनेर चकाचक; डॉ. मैथिलीताई तांबे आणि टीमचा ‘ऑन ड्युटी’ श्रीगणेशा!
रात्री रस्ते धुतले, सकाळी झाडू मारला: असा झाला 'ॲक्शन प्लॅन'








