अमोल शेलकर – (राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र – TEAM RGSS)
विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर झालेली ही पहिलीच जनतेतील निवडणूक होती. या निकालाने हे सिद्ध केले आहे की, संगमनेरच्या मतदारांनी विधानसभेला झालेली चूक वेळीच दुरुस्त करून साहेबांनी गमावलेला जनाधार पुन्हा व्याजासकट, एका भव्यदिव्य विजयाच्या रूपाने त्यांच्या पदरात टाकला आहे. साहेब म्हटले की एकनिष्ठ, पक्षनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठतेचा संगम, हेच या विजयाने पुन्हा अधोरेखित केले.
२०२४ ला झालेला तो राजकीय अपघात मागील वर्षभरात कोणीही विसरू शकले नव्हते. शहर असो की गाव, साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते एका योग्य संधीची वाट पाहत होते. अखेर नगरपालिकेच्या निमित्ताने ही संधी चालून आली आणि संपूर्ण शहरातील उमेदवारांसाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने, कोणताही क्लेश न ठेवता तन-मन-धनाने प्रचार यंत्रणेत मोलाची भूमिका बजावली. या लढाईचा उद्देश फक्त एकच होता—एका वर्षापूर्वी जो पराभव झाला, त्याचे उट्टे काढून दिमाखात ‘कमबॅक’ करणे!
सुरुवातीला अटीतटीची वाटणारी ही लढाई थोरात साहेबांच्या सक्षम व सूक्ष्म नियोजन यंत्रणेमुळे अखेर एकाकी झाली आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘विजयश्री’ म्हणून तिची इतिहासात नोंद झाली. विरोधकांच्या बेछूट आरोपांना जनतेने सडेतोड उत्तरे दिलीच, पण त्याचसोबत मागील ३५ वर्षांतील भ्रष्टाचार विरहित कारभार, शहराला मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील बक्षिसे आणि विकासाच्या मूलभूत सुविधांवर मतदारांनी शिक्कामोर्तब केले.
दुर्गाताईंनी मागील १० वर्षांत बदललेले संगमनेरचे रूप, २.० च्या माध्यमातून भविष्यातील विकासाची वाटचाल, सत्यजित दादांसारखा शासन दरबारी हक्काने प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सुख-दुःखात नेहमीच वावरणारे ‘लोकनेते नव्हे तर मित्र’ असणारे डॉक्टर साहेब, या सर्वांच्या एकत्रित जोरावर हा ऐतिहासिक विजय शक्य झाला.
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘सेवा समिती’कडून उभे केलेले सर्वसामान्य उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. थोरात साहेबांनी दिल्लीतील महत्त्वाच्या ३ बैठका रद्द करून या सामान्य उमेदवारांना वाऱ्यावर सोडले नाही, तर त्यांच्या प्रचारासाठी ते जातीने हजर राहिले. मतदारांनीही घराणेशाहीपेक्षा कर्तृत्व सिद्ध केलेल्या उमेदवारांना पसंती दिली आणि बाह्यशक्तींची ढवळाढवळ पूर्णपणे नाकारली. रेल्वेच्या मुद्द्यावरून गाजलेल्या या निवडणुकीत मतदारांनी सरकारविरोधात आपला रोष व्यक्त करत, धर्मांध शक्तींच्या वाढत्या प्रभावास आरसा दाखवला आणि संगमनेरच्या शाश्वत विकासाला भक्कम पाठबळ दिले.
विजयी सभेत साहेबांनी या अभूतपूर्व विजयाबद्दल तमाम मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानून पुढील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे. ज्या पद्धतीने साहेबांनी नगरपालिकेत एका सामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन लोकशाहीच्या प्रक्रियेत नेतृत्व करण्याची संधी दिली, त्याच पद्धतीने आगामी काळातही सामान्य घरातील उमेदवारांना पाठबळ मिळेल, अशी कार्यकर्त्यांना खात्री आहे. हा विजय म्हणजे ‘संगमनेर पॅटर्न’चा पुन्हा एकदा झालेला विजय आहे.
कहो दिलसे… थोरात साहेब फिरसे!








