संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा नाशिक-सिन्नर-अकोले-संगमनेर-अकोले-नारायणगाव-राजगुरुनगर-चाकण या मूळ आराखड्यानुसारच झाला पाहिजे, या मागणीसाठी आता जनआंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज नांदूर खंदरमाळ फाटा (संगमनेर) येथे या मार्गावरील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि रेल्वे कृती समितीची महत्त्वपूर्ण विचारमंथन बैठक सोमवारी पार पडली. आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक पुणे रेल्वे मूळ मार्गानेच सरळ रेषेत जावी यासाठी सर्वपक्षीय आंदोलन उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांनी आपल्या या मागणीसाठी नुकताच अकोले-संगमनेर भव्य मोर्चा काढला होता. 22 किलोमीटरचे अंतर पार करत संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चामध्ये संबंधित सर्व आमदार खासदारांनी एकत्र बैठक करून या आंदोलनाचे नेतृत्व करावे असे आवाहन अकोलेकरांनी केले होते. आमदार सत्यजित तांबे यांनी या आवाहनानुसार पुढाकार घेतला.
नाशिक आणि पुणे या दोन प्रमुख औद्योगिक शहरांच्या विकासासाठी, या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्तम वाहतूक व्यवस्था मिळण्यासाठी आणि विद्यार्थी व नोकरदारांच्या हितासाठी हा रेल्वे मार्ग पूर्वीच्याच सरळ मार्गाने होणे अत्यंत गरजेचे असल्याचा सूर या बैठकीत उमटला. संवाद व संघर्ष या दोन्ही मार्गाने प्रयत्न करून आपली मागणी मान्य करून घेण्यावर यावेळी सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे एकमत झाले.
या प्रकल्पासाठी आतापर्यंत शासनाने जवळपास १००० कोटी रुपये खर्च केले असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण देखील पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत आता इथून माघार न घेता रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच व्हावा, अशी ठाम भूमिका सर्व लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. नाशिक-शिर्डी आणि अहिल्यानगर-पुणे या रेल्वे मार्गांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, मात्र नाशिक-पुणे रेल्वेच्या मूळ मार्गात बदल करणे आम्हाला मान्य नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडणार आहे. आजच्या बैठकीतूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करण्यात आली असून, त्यांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्याचे मान्य केले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीत नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी प्रास्ताविक केले. खासदार डॉ. अमोल कोल्हे त्याचप्रमाणे खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार शरद सोनवणे, आमदार किरण लहामटे, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, नीलम अमोल खताळ, उत्कर्षा रूपवते, उदय सांगळे, कॉ. अजित नवले, कॉ. कारभारी नवले, बाजीराव दराडे, कपिल पवार, दत्ता ढगे, महेश नवले, गणेश ताजने, मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, डॉ. संदीप कडलग, विनय सावंत, जालिंदर वाकचौरे, अमोल वाघमारे, प्रमोद मंडलिक, वसंत बाळसराफ यांसह विविध तालुक्यातील रेल्वे कृती समितीचे प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय फटांगरे यांनी स्वागत केले.
🌟 🌟 संवादाने प्रश्न मिटेल अशी आशा यावेळी सर्व आमदार खासदार व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. मात्र तसे झाले नाही तर नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर या सर्व परिसरामध्ये व्यापक जनजागृती करून भव्य लढा उभारण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. सिन्नर ते राजगुरुनगर असा भव्य व्हेईकल मार्च काढून आंदोलनाची तयारी करण्याबाबत यावेळी प्रस्ताव मांडण्यात आला. सरकारने जनभावना लक्षात न घेतल्यास चाकण किंवा आळेफाटा या ठिकाणी बेमुदत चक्काजाम आंदोलन करून हा प्रश्न केंद्रस्थानी आणण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.









