संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी शिवारात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका पिकअपवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० हजार रुपये किमतीची १ ब्रास वाळू आणि ३ लाख रुपये किमतीची टाटा झेनॉन पिकअप असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आश्वी पोलीस ठाणे हद्दीत अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना पानोडी गावच्या शिवारातील कॅनॉलवर एक संशयास्पद टाटा कंपनीची पिकअप गाडी दिसून आली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता ऋषिकेश कारभारी वर्षे (वय २८, रा. कनोली, ता. संगमनेर) याच्या ताब्यात असलेल्या या गाडीच्या हौद्यात अवैध वाळू साठा आढळून आला.
चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. यावेळी ही वाळू जोर्वे गावातील प्रवरा नदीच्या पात्रातून चोरून आणल्याची कबुली चालकाने दिली.
या कारवाईनंतर पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब अशोक गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर २९८/२०२५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, संतोष खैरे, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात आणि चालक भगवान धुले यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत.








