संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज-
शहरातील मदिनानगर भागात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर संगमनेर शहर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली. या धाडसी कारवाईत पोलिसांनी कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका केली असून, तब्बल ७०० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी जनावरे, मांस आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
मदिनानगरमधील गल्ली क्रमांक चारमध्ये काही इसमांनी गोवंश जनावरे आणि वासरे कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बांधून ठेवल्याची गुप्त माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, बारवकर यांनी तातडीने पोलीस पथकासह रविवारी रात्री सव्वाएक वाजेच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकताच त्या ठिकाणी सुरू असलेला प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने हालचाली करत कत्तलीच्या दाढेत असलेल्या जनावरांची सुरक्षित सुटका केली, तर कारवाईदरम्यान पोलिसांना घटनास्थळी ७०० किलो गोमांस आढळून आले, ते पोलिसांनी जप्त केले आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी फारूख युसूफ सय्यद याच्यासह इतर पाच अनोळखी इसमांविरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सहाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, संगमनेर शहरात यापूर्वीही अनेकवेळा अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांनी धडक कारवाया केल्या आहेत. मात्र, तरीही छुप्या पद्धतीने हे कत्तलखाने पुन्हा पुन्हा सुरू होत असल्याचे समोर येत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, हे अवैध कत्तलखाने कायमस्वरूपी कधी बंद होणार? असा जळजळीत सवाल आता संगमनेरकरांमधून उपस्थित केला जात आहे.








