संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरमध्ये सोमवारी रात्री एका नगरसेवकासह १७ जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा नवनिर्वाचित नगरसेवकाकडून अशाच घटनेची पुनरावृत्ती आज (मंगळवारी) पुन्हा झाल्याचा नवीन प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ माजली आहे. संगमनेर शहरात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे.
मिरवणुकीतील गुलाल धुऊन काढण्यासाठी व कचरा काढण्यासाठी फिर्यादीने नगरपालिकेचे वाहन बोलावले या किरकोळ कारणावरून फिर्यादी महिला आणि साक्षीदारांना नवनिर्वाचित नगरसेविकेसह काही जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सात आरोपींसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यशोदा राजेंद्र अभंग (वय ४०, रा. इंदिरानगर गल्ली नं. ९) यांच्या घरासमोर मिरवणुकीचा गुलाल आणि कचरा साचला होता. हा कचरा साफ करण्यासाठी त्यांनी नगरपालिकेचे वाहन बोलावले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी “तुम्ही वाहन कशासाठी बोलावले?” असा जाब विचारत वाद घातला.
आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचे आणि खिडकीचे नुकसान केले. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत फिर्यादी महिला स्वतः जखमी झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ११०२/२०२५ भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११५(२), १८९(२)(५), ३२४(१), ३५२, ३५१(२) नुसार संजय मुरलीधर गाडे, वनिता संजय गाडे, शिवराज संजय गाडे, हरिष दिलीप थोरात, ओमकार थोरात, वैष्णव मुर्तडक, सागर कानकाटे या प्रमुख आरोपींसह इतर अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत.








