संगमनेर | अनंत पांगारकर
राजकीय सुसंस्कृतपणाचा वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात गेल्या दोन दिवसांपासून नवनिर्वाचित नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी घातलेल्या धुमाकुळाने शांतताप्रिय नागरिक गोंधळात सापडले आहेत. या गुंडशाहीची गंभीर दखल घेत संगमनेर शहर पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा थेट इशारा पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिला आहे.
राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या सातत्याच्या प्रयत्नातून संगमनेरने अनेक बाबतीत विकासाची मोठी भरारी घेतली आहे. एकीकडे शांत आणि संयमी असे थोरात-तांबे यांचे नेतृत्व राज्यभरात ओळखले जाते. या अनुषंगाने संगमनेरने शांत आणि सुसंस्कृत शहराचे स्वतंत्र असे अस्तित्व राज्याच्या पटलावर निर्माण केले आहे.
नगर परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी विजयी उमेदवार, समर्थकांकडून शहराच्या विविध भागात जोरदार राडा झाला. आनंदाच्या मिरवणुकांचे रूपांतर थेट हिंसक संघर्षात झाले. विशेष म्हणजे, ज्यांच्या खांद्यावर शहराच्या विकासाची जबाबदारी आहे, त्या नवनिर्वाचित नगरसेवकांनीच कायदा हातात घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यांच्या घटनांनंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी तातडीने दोन गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांचा कडक इशारा- शहरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आता ‘फुल ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. पोलीस निरीक्षक बारवकर यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले की, निवडणुकीतील जय-पराजय हा लोकशाहीचा भाग आहे, पण त्याचे रूपांतर हिंसेत होणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. मग तो लोकप्रतिनिधी असो वा सामान्य कार्यकर्ता; कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. आम्ही कोणाचीही भीडभाड धरणार नाही, सर्वांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.
अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन- वातावरण चिघळू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. जे लोक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक बारवकर नेमकं काय म्हणाले बघा व्हिडिओ….








