अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज-
जिल्ह्यातील वाढता बिबट-मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि वन्यजीव संरक्षणाकरिता वनविभाग आता अधिक गतिमान झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या १४ रेस्क्यू वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बुधवारी निळवंडे येथे करण्यात आले. या नवीन वाहनांमुळे वनविभागाच्या ताफ्याचे बळ वाढले असून, बिबट्यांच्या दहशतीखाली असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तीत होणारे त्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडे जलद प्रतिसाद वाहनांची कमतरता होती. ही गरज ओळखून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४ रेस्क्यू वाहनांना मंजुरी दिली होती. या वाहनांचा पुरवठा आता सुरू झाला असून, निळवंडे येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात अकोले येथील वनक्षेत्रपाल यांना ‘बोलेरो कॅम्पर’ वाहनाची चावी सुपूर्द करून ही सेवा कार्यान्वित करण्यात आली.
या आधुनिक वाहनांमुळे क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना बिबट-मानव संघर्षाच्या घटना घडल्यास अत्यंत दुर्गम भागातही तातडीने पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे मदत कार्यातील विलंब टळणार असून वन्य प्राण्यांना जेरबंद करणे किंवा नागरिकांचे संरक्षण करणे अधिक सुलभ होणार आहे. वनविभागाच्या या सज्जतेमुळे जिल्ह्यातील संवेदनशील भागांमधील भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होणार आहे.
या महत्त्वपूर्ण लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार अमोल खताळ पाटील, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तसेच उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला जलसंपदा व वनविभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








