संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या प्रमुख आघाड्यांसोबतच आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या या निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील सर्व ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करून ताकदीने निवडणूक लढवली जाणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संगमनेर व फॉरेस्ट वाहतूकदार संघटना आणि किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले नाक्यावरील लालतारा कार्यालयामध्ये गुरुवारी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. बापू कानवडे होते. बैठकीची अध्यक्षीय सूचना कॉ. भिका वाघ यांनी मांडली, तर कॉ. प्रताप सहाणे यांनी त्याला अनुमोदन दिले.
या बैठकीत तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी फॉरेस्ट वाहतूकदार पीक पाहणी, उताऱ्यावरील नोंदी, शेतकरी कर्ज प्रकरणे, पेसा (PESA) क्षेत्रातील अडचणी आणि डार्क झोनमधील समस्या अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ६ जानेवारी रोजी संगमनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र लढा देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, चंदनापुरी जिल्हा परिषद गटातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष व शिवआर्मी शेतकरी संघटनेचे संस्थापक दत्ता ढगे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा यशस्वी लढे दिले असून, वेळप्रसंगी तुरुंगवासही भोगला आहे. त्यांच्या या उमेदवारीला तालुक्यातील समविचारी पक्ष आणि संघटनांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला असून, या ठिकाणी त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार न देण्याचे निश्चित केले आहे.
या बैठकीला सयाजी कानवडे, ॲड. ज्ञानदेव सहाणे, नारायण मेमाणे सर, लक्ष्मण रोडे, किसनराव गंभीरे, पोपट चौधरी, कॉ. दशरथ हासे, कॉ. रघुनाथ पवार, रजत अवसक, अनिकेत घुले, दत्ता ढगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, उद्या २६ डिसेंबर रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्ष महोत्सव अहिल्यानगर येथे साजरा होत असून, त्यानिमित्त तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.








