मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामीण भागात ‘प्रकाश योजना’ कार्यान्वित करण्यासह सुरक्षिततेच्या विविध प्रभावी उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली.
शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर- मंत्रालयातील दालनात झालेल्या या सविस्तर चर्चेत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका कृषी आणि दूध व्यवसायात प्रगत आहे. पशुपालनामुळे महिला आणि शेतकऱ्यांचा चारा काढण्यासाठी शेतात सातत्याने वावर असतो, मात्र वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात सिद्धेश सुरज कडलग या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रभावी उपाययोजनांची मागणी- यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी वनमंत्र्यांकडे महत्त्वाच्या मागण्या मांडल्या, यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर प्रकाश व्यवस्था वाढवणे, वन विभागाच्या वतीने तातडीने ‘विशेष टास्क फोर्स’ स्थापन करून ठोस कारवाई करणे, वन अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देणे या मागण्यांचा समावेश होता.
वनमंत्र्यांनी दिले तातडीचे आदेश- डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या सूचनांची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी बैठकीतूनच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले. मानवतेचे संरक्षण करणे ही आमची प्राथमिकता असून त्या अनुषंगाने वनविभागाने तात्काळ नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सिद्धेश कडलग याच्या मृत्यूनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही तातडीने फोन करून सूचना दिल्या होत्या, असे नाईक यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या बैठकीत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी वन विभागासह पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण आरोग्य या विषयांवरही मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संगमनेरात बिबट्याची दहशत: डॉ. जयश्रीताई थोरात मंत्रालयात धडकल्या; वनमंत्र्यांकडे केल्या ‘या’ प्रभावी मागण्या
डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या सूचनांची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी बैठकीतूनच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले.



मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज
वनमंत्र्यांनी दिले तातडीचे आदेश-

