संगमनेर | प्रतिनिधी
सहकारी क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे १४ ते १५ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कर्जप्रकरणे आणि कोऱ्या विड्रॉवल स्लिपचा वापर करून कर्जदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संस्थेच्या संचालक मंडळासह २२ जणांविरुद्ध संगमनेर न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या पतसंस्था विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश फुलचंद गांधी, बाळासाहेब सहादु हाडवळे, नंदू सुभाष वर्पे, सूर्यभान शेटे, नंदू कारभारी खेमनार, बाळासाहेब जगन्नाथ आहेर, जिजाबापु पोपट शिंगोटे, नामदेव गोविंद आहेर, सुधाकर बाजीराव जाधव, रंगनाथ किसन सानप, अमोल दादासाहेब गुंजाळ, संतोष संपत सातपुते, राजेंद्र अण्णा खेमनर, प्रकाश भाऊसाहेब जोंधळे अशा १४ तक्रारदारांनी न्यायालयात दाद मागितली आहे. फिर्यादीत असा आरोप करण्यात आला आहे की, संस्थेने शेती आणि व्यापारासाठी कमी दरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून कर्जदारांच्या नावावर मोठी रक्कम मंजूर केली. मात्र, प्रत्यक्ष कर्जदाराला कमी रक्कम देऊन उर्वरित रक्कम कोऱ्या विड्रॉवल स्लिपवर सह्या घेऊन लंपास करण्यात आली.
अशा प्रकारे झाला ‘पद्धतशीर’ अपहार- फिर्यादीनुसार, शेती व व्यापार व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून पतसंस्थेने जमीन व गृहतारण योजनेअंतर्गत कर्ज मंजूर केल्याचे कागदोपत्री दाखवले. मात्र प्रत्यक्षात मंजूर कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदारास न देता, कोऱ्या विड्रॉवल स्लिप्स व कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने सह्या घेऊन उर्वरित रक्कम अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जमिनीचे चुकीचे मूल्यांकन, बनावट दस्तऐवजांचा वापर- तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कर्ज मंजुरीच्या वेळी जमिनीचे प्रत्यक्ष बाजारमूल्य व शासकीय मूल्य वेगळे असताना, पतसंस्थेने जाणूनबुजून चुकीचे व वाढीव मूल्यांकन दाखवले. काही प्रकरणांत आतल्या भागातील जमिनी रस्त्यालगत असल्याचे भासवून खोट्या चतु:सीमा नमूद करून बनावट गहाणखते व कर्ज दस्तऐवज तयार करण्यात आले, असा आरोप आहे.
याशिवाय, कर्जदाराच्या खात्यात संपूर्ण कर्जरक्कम जमा झाल्याचे भासवून प्रत्यक्षात ती रक्कम न देता, ती इतर खात्यांमध्ये वळवण्यात आली किंवा संचालक व त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. ही केवळ एखाद-दोन प्रकरणांची बाब नसून, याच पद्धतीने शेकडो कर्जदारांची फसवणूक करण्यात आली असून सुमारे ११ ते १२ कोटी रुपयांची बोगस कर्जप्रकरणे पतसंस्थेच्या नोंदींमध्ये दाखवण्यात आली आहेत. हा प्रकार प्रशासकीय चूक नसून संचालक मंडळ, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी संगनमताने रचलेला पूर्वनियोजित आर्थिक कट असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
व्यवस्थापक गजानन चिमण ठाकरे यांच्यासह संचालक राजकुमार रतिलाल गांधी, नंदनमल बंडुलाल बाफना, सुमतीलाल उत्तमचंद भंडारी, कांतीलाल आनंदराम गांधी, आनंद मोहनलाल दरडा, सचिन सुमतीलाल धाडीवाल, छाया प्रफुल्लकुमार बोगावत, सुनिता धर्मेंद्र पिपाडा, अशोक भागुजी नारायणे, प्रितेश चंद्रकांत पारख, महेश केशरचंद पितळे, वैभव रमेश ढोरे, दिलीप दिगंबर मैड, अभिजित रमेश भावसार, रामकृष्ण नामदेव भागवत, बाळासाहेब दत्तात्रय मुर्तडक, रमेश लक्ष्मण बुळकुंडे, प्रतिभा भाऊसाहेब गडाख, कविता दादासाहेब दिघे, श्रीमती राजश्री विजय कुऱ्हे आणि कांतीलाल अमरचंद धाडीवाल यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. आरोपींमध्ये शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिकांचा समावेश असल्याने संगमनेरच्या पतसंस्था विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. पतसंस्थेतील ठेवीदार आणि सामान्य सभासदांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हा घोटाळा अत्यंत गंभीर आणि व्याप्ती मोठा असल्याने, याचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी आर्थिक गुन्हे शाखा किंवा सीआयडीकडे सोपवावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. यापूर्वी पोलीस ठाण्यात दाद न मिळाल्याने अखेर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १७५ (३) नुसार थेट न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे. पुणे येथील ‘एपीजे लीगल’चे ॲड. प्रसन्नकुमार मनोहर जोशी आणि ॲड. प्रथमेश किरण गांधी या प्रकरणी फिर्यादींची बाजू मांडत आहेत.
कोऱ्या स्लिपवर सह्या आणि कोटींचा अपहार; संगमनेरच्या नामांकित पतसंस्थेविरोधात कोर्टात ‘फौजदारी’ तक्रार; व्यवस्थापक, संचालकांविरुद्ध न्यायालयात धाव
आरोपींमध्ये शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिकांचा समावेश असल्याने संगमनेरच्या पतसंस्था विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.








