संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर शहराचा नावलौकिक आणि वैभव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शहरात प्रशासकीय राजवट असताना जनसामान्यांच्या प्रश्नांवर ब्र काढायला तयार नसलेले महायुतीचे पदाधिकारी आता निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अचानक सक्रिय झाले आहेत.
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी अद्याप आपल्या पदाचा कार्यभारही हाती घेतलेला नसताना मुख्याधिकाऱ्यांना निवेदने देऊन आंदोलनाचा पवित्रा घेणे, ही निव्वळ राजकीय स्टंटबाजी असल्याची खरमरीत टीका माजी नगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक दिलीपराव पुंड यांनी केली आहे.
दिलीपराव पुंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महायुतीच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र प्रहार केला आहे. ते म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संगमनेरने विकासाची एक वेगळी उंची गाठली आहे. मात्र, मागील चार वर्षांच्या प्रशासकीय काळात सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकारणासाठी शहरातील अनेक महत्त्वाची कामे रखडवली, हे संपूर्ण संगमनेरकरांना माहीत आहे.
याच काळात शहरात स्वच्छतेचे प्रश्न निर्माण झाले होते, कचऱ्याचे ढीग साचले होते, तेव्हा संगमनेर सेवा समितीच्या वतीने आम्ही वेळोवेळी आंदोलने करून प्रशासनाचे डोळे उघडण्याचे काम केले. मात्र, तेव्हा सत्ता पाठीशी असलेले महायुतीचे हेच पदाधिकारी पूर्णपणे गायब होते. त्यांना तेव्हा शहराच्या प्रश्नांचे सोयरसुतक नव्हते आणि साधे एक निवेदन देण्याची तसदीही त्यांनी कधी घेतली नाही.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीवर जनतेने विश्वास टाकला असून महायुतीच्या भूलथापांना आणि शहरात अशांतता पसरवू पाहणाऱ्या प्रवृत्तींना मतदारांनी थेट नाकारले आहे. या मोठ्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातूनच आता ही निवेदने देण्याची घाई सुरू झाली आहे. मुळात नवीन नगराध्यक्ष, नगरसेवकांनी अद्याप चार्ज सुद्धा घेतलेला नाही, अशा परिस्थितीत प्रशासकीय काळात गप्प बसलेले लोक आता जनहिताचा आव आणत आहेत, ही बाब अत्यंत हास्यास्पद आहे.
संगमनेरची राजकीय परंपरा ही नेहमीच सुसंस्कृत राहिली आहे. निवडणूक संपली की मतभेद संपवून केवळ शहराच्या हितासाठी एकत्र येण्याची शिकवण माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ऐतिहासिक निळवंडे पाईपलाईन योजना शहरात आणणे असो किंवा माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी राबवलेली ‘स्वच्छ व सुंदर संगमनेर’ मोहीम असो, या सर्व कामांमुळे शहराचा दर्जा सुधारला आहे. आता निवडून आलेले सर्व नगरसेवक अत्यंत प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने आपली जबाबदारी पार पाडतील आणि निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त करतानाच, जनतेने नाकारलेल्या लोकांच्या अशा स्टंटबाजीला नागरिक अजिबात महत्त्व देणार नाहीत, असेही पुंड यांनी ठणकावून सांगितले आहे.
महायुतीची स्टंटबाजी हास्यास्पद: संगमनेरच्या जनतेने नाकारल्याने महायुतीला फुटले आंदोलनाचे उधाण; माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड यांची टीका
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीवर जनतेने विश्वास टाकला असून महायुतीच्या भूलथापांना आणि शहरात अशांतता पसरवू पाहणाऱ्या प्रवृत्तींना मतदारांनी थेट नाकारले आहे.








