संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ५१ कोटी ३९ लाख रुपयांच्या विकासकामांचा आज शुभारंभ होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवारी, (२७ डिसेंबर) हा सोहळा पार पडणार असून, या निमित्ताने तालुक्यात महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
या दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून तालुक्यातील निळवंडे, तळेगाव, मालदाड, गुंजाळवाडी, वडगाव लांडगा, धांदरफळ खुर्द, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि पिंपरणे या गावांमध्ये विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जलसंपदा आणि लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने निळवंडे डाव्या कालव्यावरील निमगाव भोजापूर, सायखिंडी, वेल्हाळे, घुलेवाडी, खांजापूर, कुरण आणि तळेगाव अशा दहा लोखंडी पुलांचे ४ कोटी ५८ लाख रुपये खर्चाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
तालुक्यातील दळणवळण सुलभ व्हावे यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मोठ्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मालदाड येथील १७ कोटी २९ लाख रुपयांची कामे, पिंपळनेर ते कोळवाडी रस्त्याचे १० कोटी ६४ लाख रुपयांचे काम, आणि मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द या नव्याने मंजूर झालेल्या ६ कोटी ५९ लाख रुपयांच्या रस्त्याचा समावेश आहे. याशिवाय वडगाव लांडगा येथे ५ कोटी २१ लाख, हिवरगाव पावसा येथे ५ कोटी ८ लाख आणि चंदनापुरी येथे ३ कोटी ८१ लाख रुपयांच्या कामांमुळे स्थानिक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागणार आहे.
केवळ भौतिक विकासच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी धांदरफळ येथील कार्यक्रमात थेट लाभ हस्तांतरण केले जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ३३ लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व अवजारांसाठी ३५ लाख २५ हजार रुपये, तर एमआयडीएच अंतर्गत हरितगृह व शेडनेट उभारणीसाठी १४ लाभार्थ्यांना १ कोटी ५३ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून ८ लाभार्थी कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपयांप्रमाणे आर्थिक मदत दिली जाईल.
पिंपरणे येथे होणार भव्य जाहीर सभा- दिवसभर चालणाऱ्या या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याची सांगता सायंकाळी पिंपरणे येथे एका जाहीर सभेने होणार आहे. या सभेच्या माध्यमातून पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ तालुक्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना संगमनेर तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगमनेर तालुका महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.








