
संगमनेर | प्रतिनिधी
ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या ‘जलजीवन मिशन’ आणि ‘घरकुल’ यांसारख्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अत्यंत संवेदनशीलपणे होणे आवश्यक आहे. या योजना केवळ कागदावर न राहता, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी आणि त्यातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात. कामात दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिल्या.
संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित विविध विभागांच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना आ. खताळ म्हणाले की, जेव्हा ग्रामीण भागातील नागरिक एखाद्या विषयावर वारंवार तक्रारी करतात, तेव्हा त्यामध्ये निश्चितच तथ्य असते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने सुधारणा करणे ही त्यांची जबाबदारी आहे. जलजीवन योजनेच्या कामात अनेक ठिकाणी त्रुटी असल्याचे समोर येत आहे. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन पुढच्या एक महिन्यात सविस्तर अहवाल सादर करावा. यापुढे प्रत्येक महिन्याला स्वतः कामांचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामांबाबत खताळ यांनी संताप व्यक्त केला. सहा महिन्यांतच रस्त्यांवर खड्डे पडत असतील, तर ती शासनाच्या प्रतिमेची हानी आहे. केवळ ‘काम प्रगतीपथावर’ असे कागदी घोडे नाचवून चालणार नाही; प्रत्यक्ष पाहणी करूनच दर्जा तपासला जाईल. वेळप्रसंगी मी स्वतः फिल्डवर येऊन कामाची गुणवत्ता तपासेल, असा इशारा त्यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेत संगमनेर तालुका मागे पडता कामा नये, असे सांगताना खताळ म्हणाले की, शासनाने घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार असून, या निर्णयाची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेता टँकर व्यवस्थेचे नियोजन आत्तापासूनच करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयावर भर देताना खताळ यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी जनतेशी सौजन्याने वागावे. गावात कामात अडवणूक होत असल्यास थेट कळवावे, मात्र कामाचा दर्जा आणि पारदर्शकता पाळलीच पाहिजे.



