
संगमनेर, प्रतिनिधी –
रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरियाची कमतरता भासू नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाचा आढावा घेतला. तालुक्यातील ४३९ कृषी सेवा केंद्रांमध्ये सध्या १५२९ मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक असून, लवकरच नवीन रॅक उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
काही भागांत खत टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, आ. खताळ यांनी कृषी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. युरियाचे वितरण टप्प्याटप्प्याने आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. उर्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून प्रत्येक शेतकऱ्याला खत मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी अधिकृत केंद्रांवरून आधारकार्ड आणि सातबारा या कागदपत्रांच्या आधारेच खत खरेदी करावे. युरिया उपलब्धतेबाबत काही समस्या असल्यास शेतकऱ्यांनी थेट आमदार संपर्क कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.





