
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
आमच्या काही चुका झाल्या, हे मी जाहीरपणे कबूल करतो. आणि आमच्या याच चुकांमुळे आज तालुक्यातील सत्ता कोल्ह्या-कुत्र्यांच्या’ हातात गेली आहे. पण लक्षात ठेवा, हा शरद नाना एकटा नाही, तर माझ्यासोबत असंख्य वाघ उभे आहेत. जर आमच्या नादी लागाल, तर तालुक्यात फिरणं मुश्किल होईल, अशा शब्दांत शरद नाना थोरात यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
पिंपरणे येथे आयोजित शेतकरी मेळावा आणि संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार समारंभवेळी झालेल्या जाहीर सभेत जिल्हा परिषदेच्या जोर्वे गटाची ‘बुलंद तोफ’ म्हणून ओळखले जाणारे शरद नाना थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात, संगमनेरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे, काँग्रेसच्या युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात शरद नानांनी तरुणांना आवाहन करताना सांगितले की, आज काही लोक धर्माच्या नावाखाली आपल्या ग्रामीण भागातील तरुणांचे माथे भडकवण्याचे काम करत आहेत. आम्ही काय हिंदू नाही का? छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. पण धर्माच्या नावावर राजकारण करून जे माथे भडकवत आहेत, त्यांना मातीत गाडण्याची सुरुवात आता पिंपरणे नगरीतूनच होईल.
आमदार अमोल खताळ यांचं थेट नाव घेण्याचे टाळत केवळ ‘कालचं पोरगं’ असा उल्लेख करत नानांनी त्यांना थेट इशारा दिला. भाऊ, तू कोणाचेही बोट धरून चाल, आम्हाला देणंघेणं नाही. पण संगमनेर तालुका हे आमचं एक कुटुंब आहे. जर तू आमच्या कुटुंबाच्या आणि भावाच्या (बाळासाहेब थोरात) नादी लागला, तर तुला तालुक्यात फिरणं कठीण होईल. हे माझं चॅलेंज समज, असे खडेबोल त्यांनी सुनावले.
गेल्या वर्षी शिवजयंती उत्सवात राजकारण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत शरद नानांनी संताप व्यक्त केला. शिवजयंती हा संपूर्ण समाजाचा उत्सव आहे, त्यात पक्षाचा बिबा कालवण्याचे काम विरोधकांनी केले. मी तेव्हाही स्टेजवर जाण्यास नकार दिला होता कारण महाराजांच्या उत्सवात राजकारण मला मान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे तुम्हाला वाचवायला नाना नसेल, असे देखील विरोधकांना सुनावले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विश्लेषण करताना शरद नाना म्हणाले की, तालुक्यात जो काही निकाल लागला, तो कोणाच्या कर्तृत्वामुळे नाही, तर आपल्यातील गट-तटांमुळे लागला आहे. आता आपल्याला हे गट-तट बाजूला ठेवावे लागतील. बाळासाहेब थोरात ज्याला उमेदवारी देतील, त्याच्या पाठीशी मी ढाल आणि तलवार बनून उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तब्बल अडीच ते तीन तास सुरू असलेल्या या सभेला पिंपरणे पंचक्रोशीतील हजारो नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद नानांच्या या रोखठोक भाषणामुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.






