

अकोले-
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलून तो पुणतांबामार्गे नेण्याच्या निर्णयाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र निषेध केला असून, मूळ आराखड्यानुसार देवठाण-बोटा स्टेशनसह रेल्वे सुरू करण्यासाठी ६७ गावांत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
अकोले येथील कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाने स्पष्ट केले की, रेल्वे मार्ग बदलल्यामुळे या परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि कामगार वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. रेल्वे झाल्यास युवकांना पुण्या-नाशिकसारख्या महागड्या शहरात राहण्याऐवजी गावातूनच नोकरी-व्यवसाय करणे सुलभ होणार असून उद्योगांनाही मोठी चालना मिळणार आहे.
या जनआंदोलनाला बळ देण्यासाठी किसान सभा, कामगार संघटना आणि विद्यार्थी-युवक संघटनांनी गावोगाव संपर्क सुरू केला आहे. दरम्यान, ९ जानेवारी रोजी देवठाण येथे होणारा इशारा मेळावा आणि बोटा येथील रास्ता रोको आंदोलनाला माकपने समर्थन दिले आहे.
या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ द्यावी आणि रेल्वे मार्ग पुन्हा मूळ सर्वेक्षणाप्रमाणे पूर्ववत करावा, अशी मागणी जिल्हा सचिव कॉ. सदाशिव साबळे यांनी केली आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि माकपचे कार्यकर्ते या मागणीसाठी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.






