संगमनेर (प्रतिनिधी):
संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. नवीन पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीनंतर गुन्हेगारीवर वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट दिसत आहे. बस स्थानकावरील पाकीटमारी असो किंवा रस्त्यावरील चैन स्नॅचिंग, गुन्हेगारांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील गणेश नगर भागात भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्यांचे गंठण ओरबाडून नेल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे.
राजापूर (संगमनेर) येथील रहिवासी नंदा हासे या गणेशनगरमधील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून दोन अज्ञात हेल्मेटधारी चोरटे आले. त्यांनी संधी साधून नंदा हासे यांच्या गळ्यातील ३ लाख ६७ हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून धूम ठोकली. भरवस्तीत आणि भरदिवसा घडलेल्या या ‘धूम स्टाईल’ चोरीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
संगमनेरात महिला असुरक्षित?- शहरात सातत्याने घडणाऱ्या चैन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीच्या घटनांमुळे “संगमनेर सुरक्षित आहे का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बस स्थानकावर महिलांच्या दागिन्यांची चोरी होण्याचे प्रमाण आधीच वाढलेले असताना, आता उपनगरातही महिलांना लक्ष्य केले जात आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचे नियंत्रण सुटले आहे की काय, अशी भीती सामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे.
पोलीस प्रशासनापुढचे आव्हान- नवे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीला लगाम बसेल, अशी आशा होती. मात्र, चोरट्यांनी सातत्याने कारवाया करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








