संगमनेर (प्रतिनिधी):
मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करत असताना, मानवी जीवन आणि मुक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. अत्यंत घातक ठरणाऱ्या ‘चायनीज’ नायलॉन मांजामुळे होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी संगमनेरकरांनी या मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा, असे कळकळीचे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले आहे.
चायनीज मांजा हा काच, धातू आणि विविध रासायनिक घटकांपासून बनवलेला असल्याने तो मानवी जीवितासह पक्षी, पाळीव प्राणी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत आहे. दरवर्षी संक्रांतीच्या काळात या मांजामुळे अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी होतात, तर शेकडो निष्पाप पक्षी आपले प्राण गमावतात. हा मांजा निसर्गतः लवकर नष्ट होत नसल्याने तो झाडाझुडपांमध्ये अडकून दीर्घकाळ पर्यावरणाला हानी पोहोचवतो, असे डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.
माननीय उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी २०२१ पासूनच नायलॉन मांजाच्या वापरावर कायदेशीर बंदी घातली आहे. शासनाच्या या आदेशाची कडक अंमलबजावणी संगमनेर शहरात केली जाणार असून, नगरपालिकेची विशेष पथके आणि पोलीस प्रशासन यावर बारीक लक्ष ठेवून असणार आहे.
शहरात जर कोणीही नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर करताना आढळून आले, तर संबंधितांवर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. मैथिली तांबे यांनी दिला आहे. केवळ नफ्यासाठी व्यापाऱ्यांनी असा जीवघेणा मांजा विकू नये आणि नागरिकांनीही तो खरेदी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी यंदाची संक्रांत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी. पतंग उडवण्यासाठी केवळ सुती आणि सुरक्षित मांजाचाच वापर करावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी पतंग उडवताना रत्यावरून ये-जा करणाऱ्या इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची योग्य खबरदारी घ्यावी.
मकर संक्रांतीचा सण हा आनंद आणि सुरक्षिततेचा संदेश देणारा असल्याने कोणाच्याही जीविताला धोका न पोहोचवता हा सण मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन शेवटी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले आहे.








