
संगमनेर / अकोले-
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प सुरुवातीच्या सर्वेक्षणाप्रमाणे म्हणजेच अकोले-संगमनेर मार्गेच व्हावा, या मागणीने आता पुन्हा एकदा जोर धरला आहे. या भागातील जनभावनेची सरकारने तातडीने दखल घ्यावी, यासाठी आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येणार आहे. ‘नांदूर खांदरमाळ’ येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ठरल्यानुसार, सर्व तालुक्यांमध्ये ‘लेटर टू सी. एम.’ ही व्यापक मोहीम राबवण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.
विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहभागातून उभी राहणार चळवळ- रेल्वेची ही मागणी तळागाळातील जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ही मोहीम अधिक आक्रमक केली जाणार आहे. यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवून आपल्या भविष्यातील दळणवळणाच्या हक्कासाठी मागणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे, तर प्रत्येक गावातील नागरिकांनीही स्वतः पत्र लिहून रेल्वे मूळ मार्गानेच नेण्याची आग्रही विनंती सरकारला करावी, जेणेकरून या मागणीचे रूपांतर एका लोकचळवळीत होईल.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना साकडे- या लढ्यात केवळ जनताच नव्हे, तर लोकप्रतिनिधींचे पाठबळही तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉ. नवले यांनी नमूद केले. अकोले, संगमनेर, सिन्नर, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, पुणे आणि नाशिक या भागातील सर्व खासदार, आमदार आणि राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून विशेष पत्र पाठवावे आणि सरकारवर या मागणीसाठी दबाव निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मोहिमेचा मुख्य उद्देश- नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ आराखडा हा अकोले आणि संगमनेर या भागातून जाणारा होता. मात्र, मधल्या काळात तांत्रिक बदलांच्या नावाखाली या मार्गात बदल करण्याच्या हालचाली झाल्या होत्या. हा मार्ग बदलला जाऊ नये आणि स्थानिक शेतकऱ्यांसह प्रवाशांना या रेल्वेचा प्रत्यक्ष फायदा व्हावा, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. पुढील काही दिवसांत हजारो पत्रे मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवून या मागणीकडे लक्ष वेधले जाणार असून, या मोहिमेत सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक-अकोले-संगमनेर-पुणे रेल्वे सुरुवातीच्या सर्वेनुसार व्हावी यासाठी नांदूर खांदरमाळ बैठकीत ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री यांची भेट घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
-
हा प्रश्न केवळ वाहतुकीचा नसून या संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाचा आहे. हजारो पत्रांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आता पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. — डॉ. अजित नवले.






