संगमनेर | अनंत पांगारकर
प्रशासकीय राजवटीच्या प्रदीर्घ काळानंतर संगमनेर नगरपरिषदेचे राजकारण पुन्हा एकदा लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात परतले आहे. तब्बल चार-साडेचार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पालिकेच्या ऐतिहासिक रामकृष्ण सभागृहाचे दरवाजे नवनिर्वाचित सदस्यांसाठी उघडण्यात आले. निमित्त होते उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीचे. या निवडीच्या निमित्ताने अनुभवी नगरसेवकांसह अनेक नवीन चेहऱ्यांनी प्रथमच सभागृहात पाऊल ठेवले, तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची देखील या सभागृहात पहिलीच ‘एन्ट्री’ झाली. नगराध्यक्षांच्या आसनावर विराजमान होत तांबे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड करत पहिलीच विशेष सभा यशस्वीपणे पार पाडली.
तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली होती. या साडेचार वर्षांच्या काळात नगरसेवकांसाठी बंद झालेली पालिकेची दारे आता पुन्हा एकदा खुली झाली आहेत. विशेष म्हणजे, या काळात संगमनेर पालिकेने पाच मुख्याधिकाऱ्यांचा कार्यकाळ अनुभवला. राहुल वाघ यांना सुरुवातीला कौन्सिलसोबत काम करण्याची संधी मिळाली, मात्र त्यानंतर आलेल्या रामदास कोकरे यांचा स्वच्छतेच्या बाबतीत राज्यभरात दबदबा असूनही, प्रशासक म्हणून काम करताना त्यांना मर्यादा आल्या. लोकप्रतिनिधींची (कौन्सिलची) साथ नसल्याने कोकरे यांना संगमनेरच्या कचरामुक्तीचे स्वप्न पूर्ण करता आले नाही आणि ते राजकीय बळी ठरल्याच्या चर्चेसह त्यांची बदली कल्याण महापालिकेत झाली.
या दरम्यानच्या काळात सतीश दिघे यांची अवघ्या काही तासांसाठी झालेली नियुक्ती आणि या काळात नेमके पालिकेत काय घडले हे गुलदस्त्यात असल्याने या मुख्याधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या चर्चाही संगमनेरात रंगल्या होत्या. त्यानंतर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनश्री पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेला अतिरिक्त पदभार, अशा अनेक घडामोडी घडल्या. अखेर विद्यमान मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांना कामासाठी नवनिर्वाचित कौन्सिलची साथ मिळणार आहे. मंगळवारची ही विशेष सभा मुख्याधिकारी गोरे यांच्यासाठीही पहिलीच बैठक ठरली. आता साडेचार वर्षांनंतर सभागृहाचे टाळे उघडल्याने शहराच्या विकासाचे निर्णय पुन्हा एकदा याच रामकृष्ण सभागृहात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेतले जाणार आहेत. अनेक माहितगार अधिकारी, कर्मचाऱ्यांची या काळात निवृत्ती झाल्याने संगमनेर शहराची फारशी माहिती नसलेले नवखे अधिकारी आता संगमनेरचा कारभार बघणार असल्याने या चार साडेचार वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात पालिकेच्या प्रशासकीय इमारतीतून बरेच पाणी वाहून गेले आहे.









