संगमनेर:
आपसातील सर्व हेवेदावे, मतभेद आणि मनभेद आता कायमचे बाजूला ठेवा. आता वेळ आली आहे ती फक्त भगव्यासाठी आणि शिवसेनेसाठी मैदानात उतरण्याची! आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी होणारे फेरबदल पक्षासाठी फायदेशीर ठरणार असून, त्या जोरावर सत्तेवर भगवा झेंडा निश्चितपणे रोवला जाईल, असा जोरदार विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संगमनेर तालुक्यात आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. माजी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसैनिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी सचिन कोते यांनी मुंबईतील शिवतीर्थावरील गर्दीचा दाखला देत सांगितले की, शिवाजी पार्कवर जमलेला जनसागर ही केवळ सभा नव्हती, तर ती संपूर्ण महाराष्ट्राला नवी दिशा देणारी गर्जना होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आता मुंबई, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तन अटळ आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंकडे संपूर्ण महाराष्ट्र मोठ्या आशेने पाहत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या रणसंग्रामात ‘महाविकास आघाडी’ म्हणून उतरण्याचे संकेतही या बैठकीतून देण्यात आले आहेत. शिवसेना माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आघाडी म्हणून लढण्यासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची शिष्टमंडळामार्फत भेट घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत विनंती करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रस्तावामुळे संगमनेरच्या राजकारणात काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील समन्वयाची चर्चा आता रंगू लागली आहे.
तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गटबाजी आणि अहंकार बाजूला सारून पक्षाची ‘वज्रमुठ’ आवळण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण सर्व कडवे आणि एकनिष्ठ शिवसैनिक आहोत हीच आपली खरी ओळख असून, आगामी प्रत्येक राजकीय संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी सर्वांनी दर्शवली आहे. नगरपालिकेप्रमाणेच आता पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्येही शिवसेनेच्या माध्यमातून परिवर्तन घडणारच, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच बैठकीत तळेगाव भागाचे युवा सेना तालुकाप्रमुख सागर भागवत यांनी जिल्हा परिषदेसाठी आपली उमेदवारी जाहीर करत पक्षप्रमुखांचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य असल्याचे सांगितले.
युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण आणि तालुका प्रमुख अक्षय गुंजाळ यांनीही आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरले. या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षाच्या अधिकृत दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रावसाहेब गुंजाळ, अजीज मोमीन, आशाताई केदारी, सुनील देशमुख, प्रकाश क्षत्रिय, योगेश गुंजाळ, संदीप गुंजाळ यांच्यासह तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीने संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून शिवसेनेच्या या ‘रणशंखनादा’चा धसका विरोधकांनी घेतला आहे.
संगमनेरात ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार; आता वाद नको, फक्त भगवा हवा! सचिन कोते यांचे शिवसैनिकांना आवाहन
या रणसंग्रामात 'महाविकास आघाडी' म्हणून उतरण्याचे संकेतही या बैठकीतून देण्यात आले आहेत.



संगमनेर:


