संगमनेर –
अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव आणि संगमनेर या तीनही तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून त्यांचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रूपांतर करण्यास शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.
आरोग्य मंत्री आणि शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, या तीनही तालुक्यांतील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या निर्णयामुळे आता रुग्णालयांमध्ये केवळ खाटांची संख्याच वाढणार नाही, तर त्या प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टरांची पदे, अत्याधुनिक वैद्यकीय साधनसामग्री आणि औषधांचा साठा देखील वाढणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात असून, कोणालाही उपचाराविना राहावे लागणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या १८ कोटी रुपयांच्या ‘कार्डियाक कॅथलॅब’चा फायदा आता सामान्य रुग्णांना प्रत्यक्ष मिळण्यास सुरुवात झाली आहे. या लॅबमध्ये आतापर्यंत अनेक रुग्णांची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि २-डी इको चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. तसेच, गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या ‘क्रिटिकल केअर युनिट’च्या इमारतीचे काम ६० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून, लवकरच ही सेवा जनतेसाठी खुली होणार आहे.
सर्वसामान्यांवरील उपचारांचा खर्च कमी करण्यासाठी आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील २४ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यापोटी शासनाने संबंधित रुग्णालयांना ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकीकडे आरोग्य सुविधांचे जाळे विस्तारत असतानाच, दुसरीकडे जिल्ह्यात गर्भलिंग निदान चाचणीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला कडक निर्देश देण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या बाबीचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयात सुमारे १८ कोटी रुपये निधीतून सुरू करण्यात आलेल्या ‘कार्डियाक कॅथलॅब’चा रुग्णांना मोठा लाभ होत आहे. या लॅबमध्ये आतापर्यंत १३ रुग्णांची अँजिओग्राफी, ३ रुग्णांची अँजिओप्लास्टी आणि ७७ रुग्णांची ‘२-डी इको’ चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली आहे.








