महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
एकंदरीत आज ज्या बातम्या पाहण्यात आणि वाचण्यात येत आहेत, त्या सगळ्या या परीक्षेबद्दलच आहेत. माझा पाल्य आणि आम्ही गेले दोन वर्षांपासून याची तयारी करत आहोत. खरं तर ही एका विद्यार्थ्याची परीक्षा नसून संपूर्ण कुटुंबच यात गुंतलेले असते. आधी प्रशिक्षण वर्गांचे प्रवेश तेही परगावी, मग त्यासोबत राहण्याची सोय, ते झाले की योग्य खोली भागीदार मिळायला हवा, त्यानंतर त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय बघा, मग वर्गाला जाण्या-येण्याची सोय आणि असे बरेच काही करावे लागते. दहावी झालेली मुले फार प्रगल्भ नसतात, त्यामुळे त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष राहावे म्हणून काही मातांना घर सोडून त्यांच्यासोबत राहावे लागते, तर काही ठिकाणी आजींनी ही जबाबदारी निभावली आहे. म्हणूनच मी म्हटले की ही संपूर्ण कुटुंबाचीच एक परीक्षा आहे.
एकंदरीत याकडे पाहिल्यास ज्या पद्धतीने विद्यार्थी शिकतो, प्रामाणिकपणे अभ्यास करतो, काही स्वप्ने उराशी बाळगतो तसेच त्याच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःच्या क्षमतेनुसार तो या प्रवेश परीक्षेला सामोरा जातो. ३ मे २०२६ रोजी परीक्षा पार पडते आणि अगदी जीव भांड्यात पडल्यासारखे सगळ्यांना वाटते. मुले घरी येताच सर्वप्रथम आजी म्हणते, “संपला माझ्या बाळाचा वनवास!” मग लगेच सुट्टीत काय काय करायचे, कुठे फिरायला जायचे याचे नियोजन सुरू होते. हे सर्व चालू असताना अचानक एके दिवशी बातमी कळते की परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली. हे ऐकून अक्षरशः पायाखालची जमीनच सरकते आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो.


हळूहळू सगळे दोषी समोर यायला लागतात, पण या २२ लाख विद्यार्थी आणि पालक यांच्या भावनांचा कोणीच विचार करत नाही. काही विद्यार्थ्यांनी तर ही परीक्षा पुन्हा दिलेली असते, पण कोणाला काय त्याचे सोयरसुतक! बिचारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आता पुढे काय, याचाच विचार करत बसतात. आणि मग काय तर सरकारकडून जाहीर होते की, तुम्हाला नवीन परीक्षा द्यावी लागेल, त्यासाठी शुल्क भरावे लागणार नाही, परीक्षेसाठी शहर निवडण्याची मुभा मिळेल, २१ जून २०२६ रोजी परीक्षा होईल वगैरे वगैरे…
आता वस्तुस्थितीचा विचार केला तर, जी मुले परगावाहून परत आली होती त्यांना पुन्हा एक महिन्यासाठी राहण्याची सोय करावी लागणार. आणि केवळ एका महिन्यासाठी भाड्याने सदनिका किंवा खोली मिळणे अत्यंत कठीण आहे. ज्यांना मिळाली त्यांचे नशीबच, पण या सगळ्या अडचणींचा विचार कोण करणार? आता या परीक्षेविषयी जे काही समोर येत आहे, ते एकूणच धक्कादायक आहे. मग असे वाटते की कशाला अशा परीक्षा घ्यायच्या? पूर्वीची पद्धत काय वाईट होती का? बारावीच्या मंडळाच्या गुणांवर प्रवेश मिळायचा, तीच पद्धत योग्य होती किंवा प्रत्येक राज्याची स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेता आली असती. आता तर म्हणतात की पुढील वर्षापासून संगणक आधारित परीक्षा घेऊ, पण प्रत्यक्ष पातळीवर हे किती शक्य होणार हे देवालाच ठाऊक! जे काही झाले आहे ते शब्दात मांडता येण्यासारखे नाही. दोषींना किती कठोर शिक्षा होईल हे देवच जाणे, पण आम्ही मात्र ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ म्हणून कामाला लागलो आहोत.




