महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर/संगमनेर:
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक आणि क्रूर कत्तल करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथील तीन सराईत आरोपींवर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’च्या कलम १११ अन्वये संघटित गुन्हेगारी अंतर्गत वाढीव कलम लावून कडक कारवाई करण्यात आली आहे. श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
पोलिसांच्या या कठोर पावलामुळे संगमनेर व परिसरात गो-तस्करी करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेर येथील गल्ली नंबर ६, जमजम कॉलनी भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीच्या जिवंत जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना डांबून ठेवण्यात आले होते. तसेच तिथे काही जनावरांची कत्तल देखील करण्यात आली होती.
या प्रकरणी मिळालेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३०५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २ लाख ८७ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता, ज्यामध्ये १५० किलो गोवंशीय जनावरांचे मांस (गोमांस), चाकू आणि डिजिटल वजन काटा यांसारख्या साहित्याचा समावेश होता.
या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता, मुख्य आरोपी नवाज जावेद कुरेशी, समद जावेद कुरेशी आणि नावेद जावेद कुरेशी (सर्व रा. जमजम कॉलनी, संगमनेर) व त्यांच्या इतर ३ ते ४ अनोळखी साथीदारांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एक संघटित टोळी बनवल्याचे उघडकीस आले. या टोळीने गोवंशीय जनावरांना विना चारा-पाण्याशिवाय डांबून ठेवणे, कत्तल करण्यासाठी त्यांची बेकायदेशीर वाहतूक करणे आणि गोमांसाची विक्री करून बेकायदेशीर मार्गाने आर्थिक व भौतिक लाभ मिळवणे, अशा गंभीर गुन्हेगारी कृत्यांची साखळीच सुरू ठेवली होती.
आरोपींचा पूर्वेतिहास तपासला असता, त्यांच्यावर यापूर्वीही संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. मुख्य आरोपी नवाज जावेद कुरेशी याच्यावर तब्बल १५ गुन्हे दाखल आहेत, तर समद जावेद कुरेशी याच्यावर ११ गुन्हे आणि नावेद जावेद कुरेशी याच्यावर ४ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अभिलेखावरून स्पष्ट झाले आहे. आरोपींनी एकत्रितपणे मिळून दोन किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हे केले असल्याने, त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे कलम लावणे आवश्यक होते.
या पार्श्वभूमीवर, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्याकडून अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथे एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाचे आधारे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ नुसार ‘संघटित गुन्हेगारी’चे वाढीव कलम लावण्यास परवानगी दिली. नवीन कायद्यातील हे कलम मोक्का कायद्याप्रमाणेच अत्यंत कडक असून, यामध्ये आरोपींना गंभीर स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद आहे.
सध्या या गुन्ह्यातील आरोपींपैकी २८ वर्षीय समद जावेद कुरेशी याला पोलिसांनी अटक केली असून, त्याचे इतर दोन साथीदार नवाज जावेद कुरेशी व नावेद जावेद कुरेशी हे अद्याप फरार आहेत. या फरार आरोपींबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाकडे व त्यांच्या पथकाने केली आहे.






