गुन्हेगारी सोडली नाही तर थेट जेल! १७ पोलीस ठाण्यांतील १२१ आरोपींचे ‘काऊन्सेलिंग’ आणि परेड
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या सर्व आरोपींना पुढील ६ महिने दर मंगळवारी सकाळी ११:०० वाजता कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने परिसरातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एकूण १२१ सराईत गुन्हेगारांची ओळख परेड घेत प्रतिबंधक कारवाईची विशेष मोहीम आणि समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्म्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली गेली. या मोहिमेअंतर्गत खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी हजर होते, यामध्ये सर्वाधिक ३५ आरोपी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तर १७ आरोपी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील होते. या सर्व गुन्हेगारांचे प्रथम गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित इंट्रोगेशन फॉर्म भरून घेऊन त्यांचे कुटुंब, कामाचे ठिकाण, सध्याचा व्यवसाय, वापरत असलेले वाहन आणि मोबाईल क्रमांकाची सविस्तर माहिती नोंदवण्यात आली.
त्यानंतर या सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून भारतीय नागरिक संहिता कलम १२९ अन्वये कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्यासमोर प्रत्येकी २ लाख रुपयांचे प्रतिबंधक बंधपत्र लिहून घेण्यात आले. पुढील २ वर्षांच्या कालावधीत संबंधितांनी पुन्हा कोणताही गुन्हा केल्यास त्यांच्याकडून ही २ लाख रुपयांची रक्कम वसूल करून शासनाकडे जमा केली जाईल आणि रक्कम न भरल्यास थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी केली जाईल, अशी सक्त ताकीद त्यांना देण्यात आली. यासोबतच पुन्हा गुन्हा केल्यास पूर्वीच्या गुन्ह्यातील जामीन रद्द होणे तसेच तडीपार व मोक्का सारखी गंभीर कारवाई करण्याबाबत गुन्हेगारांना समज देण्यात आली.
या समुपदेशन कार्यशाळेत गुन्हेगारांना सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच इतर गुन्हेगारांविषयी गुप्त माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे निर्देश देण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या सर्व आरोपींना पुढील ६ महिने दर मंगळवारी सकाळी ११:०० वाजता कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्म्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, कुणाल सोनवणे, अमोल भारती व निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर अहिल्यानगरमधील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.