महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शहरातील आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध एक मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्फत संगमनेर उपविभागातील गुन्हेगारांविरुद्ध पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी हा निर्णय दिला. त्यांनी उपविभागातील एकूण ८ सराईत गुन्हेगारांचा गुन्हेगारी आलेख तपासून त्यांना अहिल्यानगर जिल्हा, तसेच शेजारील जिल्ह्यांच्या सीमांमधून ६ महिने ते १ वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांच्या गोटात खळबळ उडाली असून नागरिकांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षकांनी हे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर केले. या प्रस्तावांची कसून चौकशी केल्यानंतर ते मंजुरीसाठी प्रांत अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी पाठवण्यात आले होते, प्रांत अधिकारी मुंडे यांनी यावर अंतिम शिक्कामोर्तब करून हे तडीपारीचे आदेश पारित केले. या कारवाईत तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनोशी येथील सराईत गुन्हेगार राजेंद्र तुकाराम सानप याला १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
तसेच अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोतुळ येथील रहिवासी संकेत पांडुरंग खरात, सागर विजय खरात, अनिल निवृत्ती खरात आणि दत्तात्रय निवृत्ती खरात या चौघांना प्रत्येकी ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. अकोले तालुक्यातीलच धामणगावपाट येथील सराईत गुन्हेगार किसन वाळु चौधरी यालाही ६ महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर काढण्यात आले आहे.
याशिवाय, संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदीनानगर येथील शेख राजिक रज्जाक याला १ वर्षासाठी, तर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरकुटवाडी येथील गणेश बबन कुरकुटे याला ६ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
या सर्व गुन्हेगारांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या आदेशानुसार या सर्वांना अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका या भागात प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. सदरची धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली असून, यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.