महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर
संगमनेर शहरात उपचारादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहरातील सोनांबेकर हॉस्पिटलचे डॉ. अभिजीत भाऊसाहेब कोरडे आणि डॉ. अजिंक्य अशोक सोनांबेकर यांच्यावर मृत रुग्णाच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत रुग्णाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, त्यांचे पती दत्तात्रय दळवी यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना १ मार्च २०२५ रोजी संगमनेर शहरातील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील डॉ. अभिजीत कोरडे यांनी रुग्णाला स्टेन टाकण्याचा सल्ला दिला, याला रुग्ण आणि त्यांच्या पत्नीने संमती दिली होती.
मात्र, स्टेन टाकल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी हाताला गँगरींग झाल्याचे सांगण्यात आले. या काळात डॉक्टरांनी कोणत्याही तज्ज्ञ युरोलॉजिस्ट किंवा नेफरोलॉजिस्टचा सल्ला घेतला नाही आणि उलट रुग्णाच्या नातेवाईकांकडे रुग्णाला खूप खर्च येणार आहे पैशाची व्यवस्था करा असे सांगत पैशांची मोठी मागणी केली.
उपचारादरम्यान रुग्णाची प्रकृती अधिकच खालावल्यानंतर, रुग्णाला इतरत्र हलवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना नाशिकमधील नाईन प्लस हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्ण महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत बसतो का याची पाहणी केली असता या योजनेचा मिळणारा सर्व लाभ सोनांबेकर हॉस्पिटलच्या व्यवस्थापन समितीने व डॉक्टरने तत्पूर्वीच घेतला होता. त्यामुळे योजनेअंतर्गत पतीला लाभ मिळू शकणार नाही व खर्चाचा अंदाज पाहता रुग्णाला नंतर एसएमबीटी हॉस्पिटल, घोटी येथे उपचारासाठी नेण्यात आले.
या दोन्ही रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधल्यानंतर, फिर्यादीच्या लक्षात आले की सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान गंभीर हलगर्जीपणा झाला आहे. किडनीच्या आजारावर वेळीच उपचार न केल्यामुळे रुग्णाला किडनी फेल्युअरचा त्रास झाला आणि २२ मार्च २०२५ रोजी उपचारादरम्यान रुग्ण पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या नेतृत्वाखालील समितीने केलेल्या चौकशीत सोनांबेकर हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि डॉ. अभिजीत कोरडे हे रुग्ण मृत्यूस जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या समितीने रुग्णाचा उपचारावर झालेला खर्च परत करण्याचे आदेशही हॉस्पिटल व्यवस्थापनाला दिले होते.
या सर्व बाबींचा विचार करून, निष्काळजीपणामुळे पतीचा मृत्यू आणि आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २५६/२६ भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) नुसार दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस निरीक्षक समीर बारवकर या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींवर कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.






