निळवंडे धरण आणि त्याचे डावे व उजवे कालवे आपण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले आहेत. संगमनेर तालुक्याने पाण्यासाठी नेहमीच मोठा संघर्ष केला असून, या धरणातील ६० टक्के पाणी हे संगमनेर तालुक्याच्या हक्काचे आहे. त्यामुळे तालुक्याला त्याचे हक्काचे पाणी आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार रोटेशन काळामध्ये ११ तास वीज मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. या हक्कासाठी गरज पडल्यास कार्यकर्त्यांसह सर्व शेतकरी आणि नागरिकांना एकत्रित येऊन संघर्ष करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने खांडगाव येथील खांडेश्वर सांस्कृतिक मंगल कार्यालयात आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी किसन दादा गुंजाळ होते. व्यासपीठावर माधवराव कानवडे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, डॉ. अभिनंदन पाटील, रामहरी कातोरे, आर. बी. राहणे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, ऊस आणि दूध ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारी शाश्वत पिके आहेत. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पद्धत बदलून उसाचे क्षेत्र वाढवणे आणि एकरी १०० टन उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. तीच जमीन, तेच पाणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी श्रमात हे उत्पादन शक्य आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी येईल. तसेच कारखाना कार्यक्षेत्रात १५ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास कारखाना स्वयंपूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना कायम सर्वाधिक दर दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी व्हीएसआयचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. थोरात कारखान्याने सुरू केलेल्या या ऊस विकास मेळाव्यांमुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळत असून उत्पादन वाढीसाठी याचा मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले. सर्व शेतकऱ्यांनी ऊस लागवडीपूर्वी अनिवार्यपणे माती परीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. उसाच्या पाचटाचा खत म्हणून वापर करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, पाचटामध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असल्याने ते जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरते. याशिवाय दर्जेदार बियाणे, ठिबक सिंचन, ठिबकद्वारे खत व्यवस्थापन आणि दोन सरींमधील ५ फूट अंतर या त्रिसूत्रीचा वापर करून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
ऊस लागवडीचे व तोडणीचे योग्य नियोजन होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ऊस लागवड करण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर कारखान्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले. या नोंदणीनंतर कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या वतीने संबंधित शेतकऱ्याला माती परीक्षण, ऊस बेणे आणि औषध फवारणीबाबत योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन वेळेत उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामुळे पिकाची गुणवत्ता सुधारेल.
या मेळाव्याला चंद्रकांत कडलग, ऊस उत्पादक रवींद्र भोकनळ, सतीश खताळ, मधुकर गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, सुभाष गुंजाळ, मोहनराव करंजकर, शांताराम दुबे, कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी मानले.