संगमनेर | प्रतिनिधी
राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीला मिळणारे यश आणि विरोधकांना बसलेला फटका या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी एक सूचक ट्विट करत राज्यातील ‘युवा नेत्यांचे’ कान टोचले आहेत. “केवळ आपल्या मनासारखा निकाल लागला नाही म्हणून निवडणूक प्रक्रियेवर संशय घेणे हे लोकशाहीसाठी घातक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.
आमदार तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांवर विशेष भर दिला आहे. ते म्हणतात की, महापालिका निवडणुकीचे निकाल समोर येत असताना अनेक पक्षांमधील ‘युवा नेते’ आपल्या अपयशाचे खापर थेट निवडणूक प्रक्रियेवर फोडत आहेत. वास्तविक पाहता, निवडणुका हे जनतेने आपले मत मांडण्याचे सर्वोच्च स्वातंत्र्य आहे. मतदानाचा हक्क हे लोकशाहीने दिलेले सर्वात मोठे शस्त्र असून, त्याचा सन्मान करणे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. केवळ निकाल विरोधात गेला म्हणून यंत्रणेवर संशय घेणे म्हणजे सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या कौलाचा अनादर करण्यासारखे आहे.
आमदार तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमके काय म्हटले आहे बघा…..
https://x.com/i/status/2012061430347092291
सत्यजीत तांबे यांनी पुढे असेही नमूद केले की, असे आरोप करून हे नेते आपल्याच पक्षातील त्या उमेदवारांचा अपमान करत आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून जनतेचा विश्वास संपादन केला आणि विजय मिळवला. लोकशाहीत संस्थात्मक स्वातंत्र्य आणि प्रक्रियेवरील विश्वास अबाधित राहणे गरजेचे आहे. पराभव स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आणि धैर्य असणे हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असून, निकाल स्वीकारण्याची परिपक्वता प्रत्येक नेत्याने दाखवायला हवी, असा स्पष्ट संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.
सध्या राज्यातील महापालिकांच्या निकालांमध्ये भाजप आणि महायुतीला मोठे यश मिळताना दिसत आहे. या यशानंतर विरोधकांमधील काही युवा नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, राजकीय मतभेद असले तरी लोकशाहीच्या मूलभूत प्रक्रियेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे, असे ठाम मत तांबे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, युवा नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक निकाल न पटल्याने लोकशाहीवर प्रश्नचिन्ह नको; सत्यजीत तांबेंचा ‘युवा नेत्यांना’ सडेतोड टोला
केवळ आपल्या मनासारखा निकाल लागला नाही म्हणून निवडणूक प्रक्रियेवर संशय घेणे हे लोकशाहीसाठी घातक आहे



संगमनेर | प्रतिनिधी



