नामदेव कहांडळ
भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. या युवा पिढीसमोर आज रोजगारापासून ते बदलत्या जीवनशैलीपर्यंत अनेक आव्हाने उभी आहेत. अशा काळात युवकांना केवळ भाषणे ठोकणारा नेता नको, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारा आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हवा असतो. नेमकी हीच भूमिका बजावत जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी समाजकारण, आरोग्य, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात आपल्या अभ्यासू वृत्तीने स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज ते उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर जनसामान्यांचे ‘हक्काचे मित्र’ म्हणून ओळखले जातात.
डॉ. सुधीर तांबे यांचा प्रवास एका निष्णांत सर्जनपासून सुरू झाला. वैद्यकीय पेशात असताना त्यांनी माणसाच्या शरीरातील व्याधी तर दूर केल्याच, पण समाजाला ग्रासलेल्या अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि अस्वच्छता यांसारख्या सामाजिक व्याधींवरही उपचार करण्याचा निर्णय घेतला. याच ध्येयातून त्यांनी १९९८ मध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जयहिंद युवा मंच’ची स्थापना केली. हा मंच म्हणजे केवळ एक संघटना नसून हजारो युवकांच्या स्वप्नांना बळ देणारी एक विचारपीठ ठरली. डॉ. तांबे यांनी राजकारणात येण्यापूर्वीच मतिमंद आणि मूकबधिर मुलांच्या शिक्षणासाठी ‘संग्राम मूकबधिर विद्यालया’च्या माध्यमातून कामाचा एक मोठा वस्तुपाठ समाजासमोर ठेवला होता.
संगमनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे जे व्हिजन मांडले, त्यातूनच त्यांच्यातील अभ्यासू लोकप्रतिनिधीची देशाला ओळख झाली. पुढे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून त्यांनी विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करताना २००९ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांच्या या वाटचालीस सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीचा आणि विचारांचा वारसा लाभला आहे. जसे बाळासाहेब थोरात यांना संपूर्ण महाराष्ट्र एक ‘सुसंस्कृत नेता’ म्हणून पाहतो, अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवत डॉ. तांबे साहेबांनी राजकारणात सुसंस्कृतपणा आणि शालीनता जपली आहे.
विधानपरिषदेत काम करत असताना डॉ. तांबे यांनी कधीही केवळ औपचारिकता म्हणून प्रश्न मांडले नाहीत. पाच जिल्ह्यांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी प्रत्येक प्रश्नाचा मुळापासून अभ्यास केला. मग तो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा विषय असो, किंवा १ जानेवारी २००५ पासून सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेचा प्रलंबित प्रश्न असो; प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. विनाअनुदानित शाळांचे प्रश्न मार्गी लावताना त्यांनी दिलेला लढा आजही राज्यातील शिक्षण क्षेत्रात गौरवाने चर्चिला जातो. केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सर्वांसाठी आरोग्य विमा योजना आणि बेरोजगारांच्या समस्यांसाठी त्यांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला.
डॉ. तांबे यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अफाट स्मरणशक्ती आणि साधेपणा. खान्देशातील चोपडा-रावेरपासून ते नगरमधील जामखेडपर्यंत त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क आहे. एकदा भेटलेली व्यक्ती कितीही वर्षांनी भेटली तरी तिला नाव घेऊन हाक मारण्याची त्यांची पद्धत अनेकांना थक्क करते. या आपुलकीमुळेच आज उत्तर महाराष्ट्रातील तरुण वर्ग त्यांचा चाहता झाला आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांना सौभाग्यवती आणि संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची मोलाची साथ लाभली. ‘जयहिंद महिला मंच’च्या माध्यमातून दुर्गाताईंनी महिला सबलीकरणाचे जे जाळे विणले, त्यातून हजारो स्त्रिया आत्मसन्मानाने उभ्या राहिल्या आहेत.
पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रातही डॉ. तांबे यांचे कार्य मैलाचा दगड ठरले आहे. भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेले ‘दंडकारण्य अभियान’ त्यांनी सह्याद्रीच्या कड्यांपासून ते सातपुड्याच्या पर्वतरांगांपर्यंत यशस्वीपणे नेले. तंत्रज्ञानाची माहिती, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे ते केवळ पारंपरिक राजकारणी न राहता आधुनिक काळातील युवकांचे ‘आयकॉन’ बनले आहेत. सत्तेत असो वा नसो, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र काम करणारा हा ‘विश्रांत’ आमदार आज खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा नेता नव्हे, तर ‘हक्काचा मित्र’ बनला आहे.








