संगमनेर, प्रतिनिधी –
देशभरात क्रीडाप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या संगमनेरच्या प्रतिष्ठेच्या ‘सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट चषका’वर एनबीसीसी पुणे संघाने आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात मुंबई संघाने दिलेल्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुणे संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवत मानाचा चषक पटकावला.
जय हिंद लोकचळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या २६ व्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तब्बल १० हजार प्रेक्षकांची उपस्थिती आणि १९ रणजी व आयपीएल खेळाडूंचा सहभाग हे यंदाच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात झालेल्या या चुरशीच्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २०० धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये सागर मिश्रा याने ६६ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या एनबीसीसी पुणे संघाने सुरुवातीपासूनच फटकेबाजीवर भर दिला. धिरज फटांगरे याच्या ८८ धावा आणि कर्णधार अजीज काझी याच्या नाबाद ६७ धावांच्या जोरावर पुणे संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला.
अखेरच्या १४ चेंडूंमध्ये २० धावांची गरज असताना प्रीतम पाटील याने सलग तीन षटकार ठोकून पुणे संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या कामगिरीबद्दल धिरज फटांगरे याला ‘मॅन ऑफ द मॅच’, तर संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या अमित यादव याला ‘मॅन ऑफ द सिरीज’ म्हणून गौरविण्यात आले. विजेत्या संघांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रथम पारितोषिक म्हणून ३ लाख रुपये, तर द्वितीय पारितोषिकासाठी २ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, जय हिंद परिवाराच्या माध्यमातून गेली २६ वर्षे सातत्याने या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. संगमनेरमधील उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि येथील खिलाडू वातावरणामुळे देशभरातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यास प्राधान्य देतात. क्रिकेट हा केवळ खेळ नसून त्याने देशाला एकत्र जोडण्याचे काम केले आहे. जात, धर्म, पंथ आणि भाषा या सर्व सीमा ओलांडून लोक एकत्र येतात आणि खेळाचा आनंद घेतात, हीच या स्पर्धेची खरी फलश्रुती आहे. आगामी काळात संगमनेरला क्रीडा क्षेत्रात अधिक प्रगत करण्यासाठी नवीन पिढी जोमाने काम करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे यांनी मैदानाची पार्श्वभूमी विशद करताना सांगितले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना क्रिकेटची मोठी आवड होती. पूर्वी कचेरीचे मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जागेवर भव्य क्रीडा संकुल उभे राहावे, अशी बाळासाहेब थोरात यांची इच्छा होती. ही जागा अपुरी पडत असल्याने भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून शेतकी संघाने एक एकर जागा विनामूल्य दिली, त्यामुळेच आज या ठिकाणी प्रशस्त स्टेडियम उभे राहू शकले. भविष्यात या स्टेडियमचे अधिक रुंदीकरण करण्याचा मानस असून, संगमनेरची ही क्रीडा संस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. रणजी खेळाडू व पुण्याचा कर्णधार अजीज काझी यानेही संगमनेरचे प्रेक्षक आणि येथील आयोजनाचे कौतुक करताना म्हटले की, बीसीसीआयच्या स्पर्धा सुरू असूनही खेळाडू संगमनेरमधील उत्साही वातावरणामुळे येथे खेळण्यासाठी आकर्षित होतात.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, रामहरी कातोरे, कैलास सोमाणी यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ॲड. सुहास आहेर, संदीप लोहे, अंबादास आडेप, आसिफ तांबोळी, गिरीश गोरे, निखिल पापडेजा, मनीष माळवे, सागर कानकाटे, रमेश नेहे, खलील पिरजादे, प्रवीण शिंदे, अभिनव नवले, सुमित काळंगे, सौरभ उमरजी, एकनाथ श्रीपत, शेखर सोसे, रितेश शेवाळे, सचिन भालेकर, नामदेव मुटकुळे, जतीन जांभळे, विनोद कतारी, राजेंद्र चौधरी, मेजर रवी शिंदे, सौरभ पानसरे, स्वप्नील खोजे, सुमित पानसरे, हर्षवर्धन सातपुते, आदित्य बर्गे, कुणाल आडेप, समर्थ आडेप, किरण घोटेकर, संजय गांधीनगरमधील सर्व युवक कार्यकर्ते यांच्यासह सर्व संयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.
सहकारमहर्षी क्रिकेट चषकावर एनबीसीसी पुणे संघाची मोहोर; मुंबईचा पराभव १९ रणजी व आयपीएल खेळाडूंच्या उपस्थितीत रंगला थरार; क्रिकेट देशाला एकत्र जोडण्याचे काम करते – बाळासाहेब थोरात
भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून शेतकी संघाने एक एकर जागा विनामूल्य दिली, त्यामुळेच आज या ठिकाणी प्रशस्त स्टेडियम उभे राहू शकले. भविष्यात या स्टेडियमचे अधिक रुंदीकरण करण्याचा मानस असून, संगमनेरची ही क्रीडा संस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत - सत्यजित तांबे



संगमनेर, प्रतिनिधी – 



