संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. खेडकर यांची ही निवड म्हणजे तमाशा या महाराष्ट्राच्या अस्सल लोककलेला मिळालेले ‘गतवैभव’ असल्याची भावना थोरात यांनी व्यक्त केली असून, या गौरवामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
स्वर्गीय कांताबाई सातारकर यांनी जपलेला लोककलेचा अमूल्य वारसा रघुवीर खेडकर यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेला आहे. एकेकाळी तमाशा ही कला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली असताना खेडकर यांनी आपल्या सहज सादरीकरणाने आणि आत्मीयतेने या कलेला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळवून दिली. कांताबाई सातारकर यांच्या पश्चात तमाशा फडाचे नेतृत्व समर्थपणे सांभाळण्यासोबतच, त्यांनी महाराष्ट्र राज्य तमाशा महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही अत्यंत कार्यक्षमतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे.
विशेष म्हणजे, केवळ रंगमंचावरील सादरीकरणच नव्हे तर तमाशा कलावंतांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन झालेला हा गौरव संगमनेर तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे. कलेशी असलेली निष्ठा आणि समर्पित आयुष्य जगणारे संगमनेरकरांचे लाडके ‘रघुभाऊ’ यांचा हा सन्मान प्रत्येक रसिकासाठी आणि कलाकारासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत, बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रघुवीर खेडकरांचा ‘पद्म’ सन्मान म्हणजे तमाशा कलेला मिळालेले गतवैभव – बाळासाहेब थोरात
एकेकाळी तमाशा ही कला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली असताना खेडकर यांनी आपल्या सहज सादरीकरणाने आणि आत्मीयतेने या कलेला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळवून दिली







