बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे वादळ शमले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते अजित पवार यांच्या विमानाचा आज बारामती येथे भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर सकाळी ८ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास लँडिंग होत असताना विमानाला भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरत असताना धावपट्टीजवळ एका शेतात कोसळले आणि क्षणात विमानाने पेट घेतला. परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. नागरी विमानवाहू महासंचालनालयाने (DGCA) आणि पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणीही वाचू शकले नाही. मृतांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे: अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) विदीप जाधव (मुंबई पीएसओ) कॅप्टन सुमित कपूर (वैमानिक) कॅप्टन शांभवी पाठक (वैमानिक) पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) विमानातील अन्य एक कर्मचारी. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघात इतका भीषण होता की विमानाचा अक्षरशः कोळसा झाला होता. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून बारामतीसह राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.