अकोले, प्रतिनिधी –
लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी प्रसंगी सरकार नसले तरी चालेल, परंतु मुक्त पत्रकारिता असणे ही काळाची नितांत गरज आहे. ज्या समाजात मुक्त पत्रकारिता नसते, तो समाज आंधळा ठरतो, असे परखड प्रतिपादन ‘न्यूज १८ मराठी’चे वृत्त संपादक विलास बढे यांनी केले.
अकोले तालुका पत्रकार परिषद आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलीक, प्रकाश टाकळकर, प्रा. बाळासाहेब मेहत्रे आणि श्रीनिवास रेणूकादास यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
विलास बढे यांनी आपल्या भाषणात पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, महाराष्ट्राला पत्रकारितेचा मोठा आणि देदीप्यमान वारसा लाभला आहे. आजच्या कसोटीच्या काळात हा वारसा जपण्याची आणि पत्रकारितेचे सत्व व तत्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पत्रकारिता करताना धमक्या, दबाव किंवा हल्ले यांना न घाबरता निर्भीडपणे मार्गक्रमण करणे आवश्यक आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय समाज माध्यमांच्या प्रभावामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांसमोर आर्थिक आणि नैतिक आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असून, सामान्य माणूसच ही विश्वासार्हता मिळवून देऊ शकतो. सत्याची बाजू मांडताना अनेकदा मोठी किंमत मोजावी लागते, मात्र कष्टकऱ्यांच्या आणि वंचितांच्या प्रश्नांसाठी पत्रकारांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. समाजात पत्रकारांची भीती न वाटता त्यांच्याबद्दल आदर वाटायला हवा आणि हा आदर जपण्यासाठी पत्रकारांनीही समाजाशी आपले नाते घट्ट ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात मधुकरराव नवले यांनी नमूद केले की, समाजात शहाणपण पेरण्याचे काम पत्रकारांचे आहे आणि समाजाच्या विकासात या क्षेत्राचे योगदान अमूल्य आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही आपले विचार मांडताना सांगितले की, पत्रकार हा विकास प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून ते समाजाच्या प्रश्नांसाठी वकिली करण्याचे काम करत असतात.
या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे वकील दिगंबर कावळे आणि आदित्य बिर्ला समूहाचे किशोर चाटे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल वैद्य यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय संदीप वाकचौरे यांनी करून दिला. श्रीनिवास रेणूकादास यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश आरोटे व चंद्रशेखर हासे यांनी केले आणि शेवटी रमेश खरबस यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ज्या समाजात मुक्त पत्रकारिता नसते, तो समाज आंधळा ठरतो: ‘न्यूज १८ मराठी’चे वृत्त संपादक विलास बढे
आजच्या कसोटीच्या काळात हा वारसा जपण्याची आणि पत्रकारितेचे सत्व व तत्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.



अकोले, प्रतिनिधी –
सध्या आंतरराष्ट्रीय समाज माध्यमांच्या प्रभावामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांसमोर आर्थिक आणि नैतिक आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असून, सामान्य माणूसच ही विश्वासार्हता मिळवून देऊ शकतो. सत्याची बाजू मांडताना अनेकदा मोठी किंमत मोजावी लागते, मात्र कष्टकऱ्यांच्या आणि वंचितांच्या प्रश्नांसाठी पत्रकारांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. समाजात पत्रकारांची भीती न वाटता त्यांच्याबद्दल आदर वाटायला हवा आणि हा आदर जपण्यासाठी पत्रकारांनीही समाजाशी आपले नाते घट्ट ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

