महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि कर्तृत्ववान नेतृत्वाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा या भूमीला लाभला आहे. याच विचारांच्या पायावर स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची उभारणी केली. हाच विकासाचा वारसा अत्यंत निष्ठेने आणि संयमाने पुढे नेणारे नेतृत्व म्हणून आज माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले जाते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि विकासाची दूरदृष्टी यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या अर्थाने ‘सर्वांगीण विकासाचे आर्किटेक्ट’ ठरले आहेत.
बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाचा पाया त्यांच्या कौटुंबिक संस्कारांत दडलेला आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या विचारांतून त्यांनी सार्वजनिक जीवनाचे धडे गिरवले. १९८५ मध्ये वयाच्या तरुण टप्प्यावर लोकप्रतिनिधी म्हणून काम सुरू करताना त्यांनी केवळ राजकारण न करता समाजकारणाला प्राधान्य दिले. पाण्याचा प्रश्न हा ग्रामीण जीवनाचा कणा असतो, हे ओळखून १९८९ मध्ये भंडारदरा धरणाच्या पाण्यावर संगमनेर आणि अकोले तालुक्याचा ३० टक्के हक्क मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले. याच काळात त्यांनी गावोगावी दूध संस्थांचे जाळे निर्माण करून संगमनेर तालुक्याला दुग्ध व्यवसायात देशाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले.
निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लावणे हा थोरात यांच्या जीवनाचा जणू ध्यासच राहिला आहे. १९९९ मध्ये जेव्हा त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली, तेव्हा त्यांनी अधिक सत्तेचे कॅबिनेट पद न स्वीकारता, केवळ धरणाचे काम पूर्ण करता यावे म्हणून पाटबंधारे राज्यमंत्री पद मागून घेतले. ‘आधी पुनर्वसन आणि मग धरण’ हा त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन धरणग्रस्तांसाठी मोठा दिलासा ठरला. अनेक तांत्रिक अडचणी, निधीचा अभाव आणि राजकीय अडथळ्यांवर मात करत २०१२ पर्यंत त्यांनी धरणाचे मुख्य काम पूर्ण केले. एवढेच नव्हे, तर कवठे कमळेश्वर, पिंपळगाव कोंझिरा आणि गणेश वाडी येथील अवघड बोगद्यांची कामे मार्गी लावून त्यांनी कालव्यांच्या माध्यमातून शेतीला पाणी पोहोचवण्याचे स्वप्न सत्यात उतरवले.
संगमनेर शहराचा आणि तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यात थोरात यांचा सिंहाचा वाटा आहे. शहरासाठी थेट पाईपलाईन योजना, अत्याधुनिक बस स्थानक, भव्य तहसील व प्रांत कार्यालय, कवी अनंत फंदी नाट्यगृह आणि ग्रामीण भागात उभारलेली सिमेंट बंधाऱ्यांची मालिका त्यांच्या विकासकामांची साक्ष देतात. सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला, तो केवळ त्यांच्या अहोरात्र चालणाऱ्या कामामुळेच. सकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत लोकांसाठी उपलब्ध राहणारे हे नेतृत्व आजही कार्यकर्त्यांसाठी ऊर्जेचा स्रोत आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या संयमी आणि निष्ठावान नेतृत्वाची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली आहे. महसूल, कृषी, शालेय शिक्षण आणि रोजगार हमी यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी प्रशासन लोकाभिमुख केले. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत पक्ष निरीक्षक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २०१८ मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर (CWC) त्यांची झालेली निवड ही त्यांच्या पक्षनिष्ठेची मोठी पावती होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा काँग्रेस पक्ष कठीण स्थितीत होता आणि अनेक नेते पक्ष सोडून जात होते, तेव्हा त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. “अडचणीच्या काळात पळायचे नसते, तर लढायचे असते,” हा विचार मांडत त्यांनी उभ्या महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्त्यांना संघटित केले आणि पक्षाचे दमदार पुनरागमन घडवून आणले.
कोरोनाच्या महासंकटात जेव्हा संपूर्ण जग थांबले होते, तेव्हा बाळासाहेब थोरात १८-१८ तास काम करून महसूल आणि प्रशासनाचे नेतृत्व करत होते. लॉकडाऊनमधील मजुरांचे स्थलांतर असो किंवा आरोग्य यंत्रणेची उभारणी, त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळली. त्यानंतर आलेली चक्रीवादळे आणि अतिवृष्टीच्या काळातही त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. सहकार, शिक्षण, कृषी आणि ग्रामीण विकास या चतु:सूत्रीवर आधारित त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी दिशादर्शक आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात हे केवळ एक राजकीय नेते नसून, ते महाराष्ट्राच्या विकासाचे दीपस्तंभ आहेत.
डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार.








