राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली हानी सारा महाराष्ट्र आज उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आपल्या मागे विश्वासू राजकीय वारस नसेल तर त्या राजकीय पक्षाचं कसं होतं याचं उदाहरण म्हणजे दादांच्या पक्षाची होत असलेली वाताहत होय. दादांच्या जाण्याने निर्माण झालेला त्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न अधिक गहिरा बनला आहे. दादा निर्णय घेताना जणू आपल्याच कानात पुटपुटायचे, ते आपल्याशी बोलायचे, ते आपले सल्ले घ्यायचे, अशी दावेदारी सध्या सुरू आहे. जो तो स्वार्थी पध्दतशीर आपली पोळी भाजून घेत आहे. ज्यांनी दादांना मदत केली त्यांना दावे करण्याचा जरूर अधिकार आहे. पण त्यांनी दादांना धमकावलं, त्यांच्या राजकारणाचा बट्टयाबोळ केला तेही जेव्हा दावे करतात तेव्हा आश्चर्य वाटतं. दादा हयात नसल्याचे असे फायदे घेणारे बेभरोशाचे भाऊ सध्या जोरात आहेत. ते स्वत:चं इप्सित साध्य करून घेत आहेत. आणि ज्यांना दादांनी जवळ केलं, ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच बेभरवशी भावांच्या सुरात सूर मिसळत आहेत.
दादांच्या अकाली जाण्यामुळे राज्यातल्या युती सरकारपुढे आज कोणत्याही अडचणी नसल्या तरी सरकार उत्तमरित्या चालवण्यासाठी आवश्यक असलेला अंकुश मात्र वाढण्याचीच चिन्हं अधिक. दादा होते तोवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची डाळ शिजत नव्हती. अगदीच टोकाची परिस्थिती आली की दादांच्या गटाची भीती दाखवली की संकट शमायचं. अनेकदा तर दादांमुळे मंत्री आणि आमदारांच्या लाडापोटी होणारी लूट थांबल्याची चर्चा मंत्रालयात असायची. विविध कारणांसाठी करावी लागणारी मिनतवारी दादांच्या पक्षामुळे मर्यादित असायची. दादांच्या मागे ही स्थिती अशीच राहील, असं वाटत नाही. दादांच्या पश्चात त्यांच्या पक्षाचं विलिकरण झालं तर तेच चित्र राहील, यावर मुख्यमंत्र्यांचाच काय कोणाचाच विश्वास नव्हता.
संभाव्य विलिनिकरणात ज्येष्ठ नेते असलेले शरद पवार हे स्वत:च सामील होणार असल्याने सरकारवरील अंकुश आपसुक वाढला असता. परिणामी आपल्या सोयीने सरकार चालवणं अवघड झालं असतं. अशा अंकुशाआड फडणवीसांनी सरकार काय म्हणून चालवावं? त्याऐवजी विलिनिकरणाशिवाय राष्ट्रवादीचं अस्तित्व सत्तेच्या अधिक फायद्याचं. जी अडचण मुख्यमंत्र्यांची तीच अजित दादांच्या पक्ष नेत्यांची. त्यांनाही अंकुशाशिवाय जगण्याची हौस आहे. म्हणूनच विलिनीकरण ही त्यांच्यासाठी गलेकी हड्डी बनली होती. दादांच्या पश्चात विलिनिकरणाने आपण नोव्हेअर झालो असतो, अशी त्यांची भीती होती. आणि ती खरीच होती. संभाव्य विलिनिकरणात अजित दादांचं महत्व अधोरेखित होतं. पण ते गेल्यानंतर त्यांच्यामागे असा एकही नेता नाही जो विश्वासाने पक्षाचा गाडा हाकेल. मागे राहिलेल्या नेत्यांपैकी प्रत्येकजण मंत्रिपदासाठी हापापलेला असल्याने त्यांना पक्षाहून सत्ता अधिक प्यारी असल्याने त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी द्यावी, अशी परिस्थिती राहिलेली नाही.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनिकरणाच्या मुद्यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चांवर चर्चा सुरू आहेत. दादांच्या पक्षाच्या वतीने ते स्वत:च यात उतरले होते. तर शरद पवारांच्या पक्षाकडून जयंत पाटील हे ही जबाबदारी सांभाळत होते. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि त्यातही महानगरपालिकांच्या निवडणुकीत विलिनिकरणाने जोर धरला होता. विलिनिकरण करून या निवडणुका लढवाव्यात असा सूर दोन्ही पक्षांच्या प्रमुखांचा होता. मात्र निवडणुका इतक्या घाईने पुढे आल्या की विलिनिकरणाशिवाय निवडणुका लढण्याची आफत दोन्ही पक्षांवर येऊन ठेपली होती. यातून मार्ग काढत दोन्ही पक्षांचे उमेदवार हे एकाच चिन्हावर निवडणुका लढवतील, असं ठरवण्यात आलं. तेव्हा अजित पवारांकडे पक्ष नेत्यांच्या मतांविषयी शंका उपस्थित झाली तेव्हा त्यांनी पक्ष मी चालवतो, असं थेट बजावलं. अखेर कोणतंही आडंवेडं न घेता दोन्ही पक्ष निवडणुकांना सामोरे गेले.
दोन्ही पक्षांच्या विलिनिकरणातलं हे सकारात्मक पाऊल होतं. ज्यांना याची अडचण होती त्यांच्या प्रत्येकात दादांचा भाऊ जागा झाला. या चर्चेत कुठेच नसलेले अनेकजण दादांचे भाऊ, चुलते बनले. भाऊबंदकी वाढत गेली, नको नको ते दावे करू लागले. विलिनिकरणाला असलेला विरोध डावलून निवडणूक घड्याळ चिन्हाद्वारे लढवून दादांनी पुढचं पाऊल टाकलं होतं. घड्याळ चिन्हावर निवडणुका पार पडूनही विलिनिकरणाची चर्चाच झाली नाही, असे हे भाऊ सांगू लागले. भाऊ म्हणून माझ्या कानात दादांनी विलिनिकरणाविषयी कधीच सांगितलं नाही, असं चक्क मुख्यमंत्री बोलून गेले. भावासारख्या जवळ असलेल्या दादांनी मुख्यमंत्र्यांना आपले खासगी निर्णयही सांगितलेच पाहिजे, असा काही नियम नाही. दादांनी असल्या खासगी गोष्टी कोणाबरोबर किती शेअर कराव्यात हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न होता. अशा गोष्टी दादांनी आपल्याला सांगाव्यात हे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं सामान्यांच्या बुध्दीचा भेद करणारं आहे.
जे आज दादांना भाऊ म्हणून गौरवतात त्यांनी दादांना काही कमी त्रास दिला नाही. सत्तेत यावं म्हणून त्यांच्या मागे संकटांचं शुक्लकाष्ट लावलं होतं. सरकारमध्ये काम करताना नको नको त्या रमण्याच्या घोषणा या दादांना अंधारात ठेवूनच केल्या जात होत्या. यामुळे दादा हैराण होते. या घोषणांसाठी पैसे आणायचे कुठून असा सवाल ते प्रत्येकवेळी करत. असे निर्णय घेताना दादांना विश्वासात घ्यावं, असं तेव्हा दादांच्या भावांना का वाटलं नाही? आपल्या आमदाराला जरा अधिकचा निधी दिला की दादांना जाब विचारला जायचा. पुढे तर मुख्यमंत्री असलेल्या भावाने दादांच्या फाईल आपल्या निगराणीखालून जातील, असा फतवाच काढला. तेव्हा हा भावाचा अवमान नाही वाटला? या भावाविरोधात रचलेल्या सिंचन घोटाळ्याचे खटारेभर पुरावे जेव्हा किरीट सोमय्या मुंबईत फिरवत होते तेव्हा भावामधली भावकी जागी का झाली नाही? महिन्याभरापूर्वी ज्या दादांनी भाजपच्या सत्तेच्या भस्म्याचा पोल खोलला त्या दादांना कथित घोटाळ्याच्या पोलीस चौकशीची आठवण देणार्या बावनकुळेंचे कान भावाने का पिळले नाहीत? निवडणूक घोटाळ्यावर टीका करताना अडीच हजार मतांचा भरणा केलेल्या इव्हीएम मशीनचं घबाड बाहेर काढणार्या भावाला धमक्या देताना भावातला भाऊ जागा का झाला नाही? भ्रष्टाचार केलेल्या तुमच्या अनेक फाईल्स आपल्याकडे आहेत, असं सांगणार्या भावाचं कौतुक करावं, असं तेव्हा या भावाला का वाटलं नाही?
जोवर सोबत होता तोवर भाऊ योग्य होता. तो जसा उघड बोलू लागला तसा भावाचं रूप पालटलं. दादांच्या पक्षाची आज झालेली अवस्था या कपटी भावांनी कमालीची बिघडवून टाकलीय. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली त्यांच्या पक्षाची पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा ताईंचं पुनर्वसन करणं याला कोणीही गैर ठरवणार नाही. मात्र त्यासाठी भाऊ जाण्याच्या बारा दिवसांचं दु:ख तरी पाळावं असं भावांना वाटू नये? हे पद लागलीच न भरल्यास त्याने राज्याचा गाडा अडणारा नव्हता. पदाची घोषणा करून बारा दिवसानंतर त्याची प्रत्यक्ष कृती केली असती तर आभाळ फाटलं नसतं? मात्र त्यामुळे विलिनिकरणाच्या चर्चेने वेगळं रूप घेतलं असतं. यातून बरंच काही विस्कटलं असतं. तेच काही भावांना नकोसं होतं. यामुळेच घिसाडघाईत घोषणा होऊन त्याची अंमलबजावणीही झाली. सरकारची पदं भरताना आखडतं घेणार्यांनी हे पद भरताना दाखवलेली तत्परता बोलकी होती. ज्यांचा यात पुढाकार होता त्या सार्यांनी आपला स्वार्थ जपला, स्वत:ची सोय लावून घेतली आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला पोरकी बनवली.
रविवार विशेष लेख — असे कसे हे बेभरवशाचे भाऊ…?
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.







