महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन| संगमनेर:
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या घटनेचे तीव्र पडसाद संगमनेरमध्ये उमटले आहेत. या क्रूर घटनेच्या निषेधार्थ आणि अत्याचारीत सर्वच बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने भव्य ‘कॅन्डल मार्च’ काढण्यात आला.
संगमनेर बसस्थानक परिसरातून निघालेल्या या मोर्चात महिला आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. कॅन्डल मार्च प्रांत अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर येथे उपस्थित लहान मुलींच्या हस्ते प्रांताधिकारी अरुण उंडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेचा निषेध करत नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली.
तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी या नराधमाला तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात आज महिला असुरक्षित आहेत, ही अत्यंत शरमेची बाब आहे. विकसित भारताच्या घोषणा दिल्या जात असताना प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्या चिमुकल्या मुलीचा काय दोष होता? अशा गुन्हेगारांना कोणताही जात-धर्म नसतो, त्यामुळे त्यांना चौरंगासारखी किंवा फाशीची कठोर शिक्षा देऊन समाजात दहशत निर्माण करणे गरजेचे आहे.
देशात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलणे आवश्यक असून केवळ घोषणाबाजी न करता कडक कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. यावेळी त्यांनी वडगाव पान येथील ऍसिड हल्ला प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट असल्याबद्दल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी हळहळ व्यक्त करत महिला आणि लहान मुलींना शाळेत जाणेही आता असुरक्षित वाटू लागले आहे, ही दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे. या नराधमांना मृत्युदंडापेक्षाही कठोर शिक्षा मिळावी, जेणेकरून भविष्यात असे पाशवी कृत्य करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही.
नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, एक माता आणि एक स्त्री म्हणून आज मुलींच्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. सरकारने वेळ न घालवता शक्ती कायद्यासारख्या कठोर कायद्यांची अंमलबजावणी करावी.
या ऐतिहासिक निषेध मोर्चात दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, नगरसेवक किशोर टोकसे, विशाल ढोले, सिद्धेश घाडगे, मनीषा राहणे, प्रियंका जगनर, वनिता गाडे, प्रकाश कडलग, प्राची कवडे, अर्चना दिघे, प्राजक्ता कुलकर्णी, तनिष्का कुलकर्णी, समीर कुलकर्णी, ललित शिंदे, शर्मिला हांडे, सुभाष दिघे, प्रीतम साबळे, प्राजक्ता घुले, वृषाली साबळे, डॉ. अनुराधा सातपुते, सौ. सरोज पगडाल, सौ. नंदा गरुडकर, यशवंती नरवडे, श्रीकांत साबळे, शरद पावबाके, सोमनाथ गोडसे, ऋत्विक राऊत, शुभम शिंदे, मयूर घुले, अलोक बर्डे, सुरभी मोरे, वैशाली कडबाने, अमृता राऊत आणि तात्याराम कुटे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील शेकडो नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






