छत्रपती शिवरायांचे गुरू कोण? ते शिवकालीन लढायांचे सूत्रधार कोण? याविषयींच्या वायफळ चर्चा घडवून आणणार्या बुवा आणि बाबांचा कोण सुळसुळाट सध्या देशाभर आहे. येनकेन प्रकारेन छत्रपतींच्या मागे त्यांच्या पुण्याईला किंमत न देण्याची ही स्पर्धा होय. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा जो काही पराक्रम केला तो ब्राह्मणांच्या सहभागाशिवाय नव्हता, असं दाखवण्याची सुरू असलेली अहमहिका ही केवळ छत्रपतींची बदनामीच नव्हे, तर त्यांना कमी लेखण्यासाठी केलेला कटच होय. शिवरायांविषयी गरळ ओकणार्यांबाबत सत्ताधारी सातत्याने मूग गिळून राहिल्याने त्याचा गैरफायदा देशातील शिवरायांच्या द्वेषींनी घेतला. वादग्रस्त टिपण्ण्या करायच्या आणि सत्ताधार्यांना अडचणीत आणणार्या वातावरणापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा प्रयत्न होय. मग कधी राज्यपाल यावर बोलत, तर कधी मंत्री. कधी प्रवक्ता सुधांशी बोलत तर कधी कोरटकर बडबडे. गायकवाडांसारखा वाचाळही बोलत असताना सत्ताधारी मूग गिळू आहेत. याचा फायदा बागेश्वर, स्वरूप नामक भोंदू घेणार नाहीत असं थोडीच आहे? छत्रपतींविषयी काल्पनिक बाबी पुढे करत महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न या दोघांनी केलाय.
नागपूरच्या एका कार्यक्रमादरम्यान बागेश्वर नावाच्या भोंदू बाबाने शिवाजी महाराज लढाई करून थकले आणि त्यांनी डोक्यावरील जिरेटोप म्हणे रामदासांच्या पायावर ठेवला. राज्य चालवा अशी विनंती राजांनी समर्थकांना केल्याचं विधान केलं. ज्या व्यासपीठावर बागेश्वर बरळला त्याच व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत असे राज्यकर्ते विराजमान होते. कोणतंही बूड नसलेलं वक्तव्य आपल्या समोर होऊनही या दोन्ही नेत्यांनी बागेश्वरला रोखलं नाही की त्यांच्यापुढे खुलासाही केला नाही. ज्या बागेश्वरविषयी अंधश्रध्देच्या असंख्य तक्रारी देशभरातून येत असताना त्याच्या व्यासपीठावर या नेत्यांनी जाणं हेच खरं तर आक्षेपार्ह होतं. पण आजच्या राज्यकर्त्यांचं जग अशाच भोंदूंच्या दरबारी विसावल्याने त्यांच्यापुढे माथी बडवण्यात अर्थ नाही. यामुळेच अशोक खरातसारखे राज्यात निर्माण होऊ शकले.
राज्यात अंधश्रध्दा विरोधी कायदा असताना अशा बाबांच्या व्यासपीठावर ही नेते मंडळी जातातच कशी? आपला दरबार अव्याहत सुरू रहावा यासाठी सत्ताधार्यांची भलामण करण्याची खासी पध्दत भोंदू बुवांच्या सांप्रदायाने अवलंबली आहे. त्याआड वादग्रस्त विधानं करून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचे उद्योग हे गेल्या काही वर्षांपासून अव्याहत सुरू आहेत. मात्र त्यासाठी त्यांनी छत्रपतींना ओढावं हे अती झालं. शिवाजी महाराज ही या राज्याची आणि राज्यातल्या प्रत्येकाची अस्मिता मानली जाते. असा राजा झाला नाही, होणं नाही, हे मान्य करणार्या जगाला आणि जागतिक इतिहासकारांना खोटं पाडण्यासाठी सुरू असलेला आटापिटा आणि त्यांचं समर्थन करणार्यांची करावी तितकी किव कमीच. छत्रपतींविषयी चाड असलेला कोणीही बागेश्वरच्या समोरच त्याचा पानउतारा केल्याविना राहिला नसता. दुर्देवाने तितका ताठरपणा या नेत्यांमध्ये नाही. बागेश्वरच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यात उसळलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांनी केलेला खुलासा म्हणजे तू मार मी रडतो, अशाच धाटणीचा होता.






