अहिल्यानगर:
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेली पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत टंचाईग्रस्त भागांवर सतत देखरेख ठेवली जात असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३४ गावे आणि १६२ वाड्या-वस्त्यांना ३० टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात आहे.
या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका संगमनेर, पारनेर आणि नगर तालुक्यांना बसला असून तेथे अनुक्रमे १०, १३ आणि ६ टँकर तैनात करण्यात आले आहेत. एकूण ६४ हजार ५८६ नागरिक या टँकर सुविधेवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाने टँकरच्या खेपांचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे केले असून मंजूर ९०.९२ खेपांपैकी ८८ खेपा पूर्ण केल्या जात आहेत. सुमारे ९६.७९ टक्के इतके खेपांचे प्रमाण असल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना वेळेत पाणी उपलब्ध होत आहे.






