
मुंबई, विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रशासकीय स्तरावर पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नवीन आदेश जारी केले आहेत.
या नव्या फेरबदलांनुसार डॉ. बी.एन. पाटील यांची नियुक्ती ‘रुसा’च्या प्रकल्प संचालकपदी, तर मंगेश जोशी यांची नियुक्ती पर्यटन संचालक म्हणून करण्यात आली आहे. याशिवाय कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी, कुशल जैन यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आणि रेवैया डोंगरे यांची केळापूर उपविभागात यवतमाळ येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली आहे.
गेल्या पंधरा दिवसांत राज्य सरकारने ४० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असल्या, तरी यामध्ये तुकाराम मुंढे यांची बदली सर्वाधिक चर्चेची ठरली आहे. दिव्यांग कल्याण विभागात पारदर्शक कारभार करत बोगस संस्थांवर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. सुरुवातीला त्यांची बदली मदत व पुनर्वसन विभागात करण्यात आली होती, मात्र नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनातील हजारो कोटींच्या निधीचा खर्च पाहता, राजकीय दबावामुळे त्यांची ही नियुक्ती रद्द झाल्याचे बोलले जात आहे.
परिणामी, इतर अधिकाऱ्यांना नवीन पदभार मिळाला असला तरी तुकाराम मुंढे यांना मात्र अद्याप कोणत्याही पदाविना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.






