मुंबई:
राज्य सरकारने जून २०२४ मध्ये सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणी प्रक्रियेचा टप्पा ३० एप्रिल रोजी पूर्ण झाला असून, आतापर्यंत राज्यातील १ कोटी ८९ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली शेवटची मुदत संपल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी एकूण २ कोटी ४३ लाख बहिणींनी नोंदणी केली होती, मात्र सखोल पडताळणीनंतर तब्बल ५४ लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
योजनेच्या पारदर्शकतेसाठी गेल्या दीड वर्षांपासून विविध मार्गांनी निकषांची तपासणी केली जात आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, निकषात बसत नसतानाही काही महिलांनी लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः सरकारी कर्मचारी असलेल्या महिला आणि काही ठिकाणी पुरुषांनीही महिलांच्या नावे अर्ज केल्याचे पडताळणीत उघड झाले. मार्च अखेरपर्यंत पात्र महिलांची संख्या १ कोटी ७५ लाख होती, परंतु राज्यातील अवकाळी पाऊस आणि वाढत्या उष्णतेमुळे सरकारने ई-केवायसीसाठी एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ दिली होती. या अतिरिक्त एका महिन्यात १४ लाख महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.
महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी चुकून ‘सरकारी कर्मचारी’ असल्याचा उल्लेख केलेल्या १४ लाख महिलांनी या महिनाभरात आपली चूक सुधारून योग्य माहिती सादर केल्याने त्यांचा समावेश आता पात्र यादीत झाला आहे.
मार्चअखेर प्रलंबित असलेल्या २६ लाख ३४ हजार महिलांपैकी बहुतेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. सध्या पात्र महिलांचा आकडा १ कोटी ८९ लाख झाला असला तरी, अंतिम संख्या निश्चित होण्यासाठी अजून एक-दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या पहिल्या दिवसापासूनच काटेकोर पडताळणीचे संकेत दिले होते, त्यानुसार आता ही गाळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.






