
संगमनेर, प्रतिनिधी –
पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करूनच पुढील काम करण्याच्या, कामाचा दर्जा आणि सुरक्षितता याच्याशी कोणतीही तडजोड करू नका अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
उड्डाणपुलाच्या कामदरम्यान नागरिकांना येत असलेल्या समस्यांची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी नुकतीच या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहणी दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन आमदार खताळ यांना दिले. यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी लहान भुयारी मार्ग (अंडरपास) असावा, पुलाच्या दोन्ही बाजूंचे सेवा रस्ते दर्जेदार आणि मजबूत असावेत, तसेच महामार्गावर रात्रीच्या वेळी सुरक्षिततेसाठी परावर्तक दिवे, हायमास्ट दिवे आणि स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशा मागण्या मांडण्यात आल्या.

याशिवाय पावसाळ्यात पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था करणे आणि महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केलेल्या हद्दीनुसार (राईट ऑफ वे) अचूक मोजमाप करूनच प्रत्यक्ष बांधकाम करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले की, विकासकामे करताना स्थानिक लोकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे प्राधिकरणाचे कर्तव्य आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि तांत्रिक अडचणींवर तातडीने तोडगा काढून कामाला गती द्यावी, असे ते म्हणाले.


